गडचिरोली : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील केरलापालच्या जंगल परिसरात सुरु असलेल्या चकमकीत १६ नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. आज, सकाळी ८ वाजतापासून ही चकमक सुरु असून मृत नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते, अशी शक्यता छत्तीसगड पोलिसांनी वर्तवली आहे.

सुकमा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्याच्या केरलापाल जंगल परिसरात मोठ्या संख्येने नक्षलवादी एकत्र आल्याची गोपनीय माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. यावरून सुकमा पोलीस दलाचे डीआरजी पथक आणि बिजापूर जवानांनी २८ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास संयुक्तपणे नक्षलविरोधी अभियान राबविले होते. दरम्यान, २९ मार्चला सकाळी ८ वाजताच्या सुमारास पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली.

यावेळी दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. यात १६ नक्षलवादी ठार झाले. तर दोन डीआरजी जवान जखमी झाले. अजूनही चकमक सुरु असल्याने मृत नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आत्तापर्यंत घटनास्थळावरून १६ नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्र व दारूगोळा ताब्यात घेण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नक्षलवाद्यांची चारही बाजुने कोंडी

नव्या वर्षांत नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा जवानांनी केलेल्या आक्रमक कारवायांमुळे नक्षलवादी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतररित होत आहेत. तसेच बॉर्डरवर अंतर्गत भागात बैठकाही घेत आहेत. यावर गुप्तचर यंत्रणेचे लक्ष असून नक्षल्यांच्या अनेक योजना फोल ठरत आहे. तीन महिन्यात छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागात झालेल्या विविध चकमकीत १३० पेक्षा अधिक नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. काही दिवसांपूर्वी जहाल नक्षल नेता मुरलीही ठार झाला होता. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपविण्याची घोषणा केल्यानंतर सद्याच्या घडीला छत्तीसगड मध्ये बस्तर फाईटर, सीआरपीएफ, डीआरजी आणि एसटीएफचे जवान संयुक्तपणे नक्षलविरोधी कारवाया पार पाडत आहेत. यामुळे नक्षलवाद्यांची चारही बाजूने कोंडी झाल्याचे चित्र आहे.