अमरावती : आपले संपूर्ण आयुष्य जंगलात वेचणारे अरण्यऋषी मारूती चितमपल्ली यांचे बुधवारी सोलापुरात निधन झाले. निसर्गानुभवाला त्यांनी शब्दशिल्पाची रुपकळा प्राप्त करून दिली. चार दशकांहून अधिक काळ मराठी साहित्यविश्वाला समृद्ध केले. महाराष्ट्र राज्याच्या वनविभागात महत्वाच्या पदांवर ते कार्यरत होते. मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधून ते १९९० मध्ये उपसंचालक म्हणून निवृत्त झाले. मेळघाटशी त्यांचा ऋणानुबंध होता. ‘केशराचा पाऊस’ या पुस्तकातून त्यांनी मेळघाटातील आगळीवेगळी अनुभूती व्यक्त केली आहे.

काही वर्षांपुवी ‘केशराचा पाऊस’ या पुस्तकाच्या अभिवाचनाच्या कार्यक्रमात त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली, तेव्हा त्यांनी मेळघाटातील अनुभवांचे कथन केले होते. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात कोकटू येथे वन विभागाचे विश्रामगृह आहे. त्या परिसरात जशी झाडी मुक्तागिरीला होती, तशीच वृक्षवल्ली आहे. केशराचा पाऊस हा अनुभव मी स्वत: घेतला होता. डिसेंबर महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी या जंगलामध्ये गेल्यास पहाटे एक ते दोन या दरम्यान तो पाऊस पडतो. तुमच्या अंगावर पांढरे स्वच्छ कपडे असले, तर त्यावर पडलेले केशरी रंगाचे बिंदू तुम्हाला दिसून येतात, अशी माहिती मारूती चितमपल्ली यांनी दिली होती.

मेळघाटात डिसेंबरच्या महिन्यात तिथल्या झाडांना फुले येतात. त्या फुलांवर दव पडते. त्या फुलांचे केशर हवेत जाते आणि दवासोबत ते आपल्या अंगावर पडते. हा अनुभव आपण अंगावर पांढरी शाल घेऊन अनुभवला. तेव्हा माझी शाल केशरी रंगात न्हाऊन निघाल्याची आठवण मारुती चितमपल्ली यांनी प्रकट मुलाखतीत सांगितली होती.

मारूती चितमपल्ली हे एकवेळ मेळघाटात रानम्हशींच्या शोधात गेले असताना ते रस्ता चुकले होते. पुस्तकातून त्यांनी हा अनुभव मांडला आहे. “मेळघाटातील रानवाटांची गवळी आणि त्यांच्या म्हशींशिवाय कुणाला माहिती नाही. आमची दिशाभूल झाली होती. सगळ्या वाटा या खोल दरीत जात होत्या. त्या वाटांनी आम्ही गेलो असतो, तर त्या अंधारफसव्या वाटांनी आम्हाला खाऊन टाकले असते. म्हणून आम्ही माळ सोडला नाही, पण चालून चालून थकलो होतो”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“एक मळलेली पाऊलवाट दिसली, म्हणून पुढे गेलो, तर उजेड दिसू लागला. जवळ गेल्यावर दिसले की, एक गुंठाभर रान साफ करून झोपडी उभी केली होती. झोपडीसमोर आगोठी पेटली होती. एक आदिवासी त्या आगोठीत काहीतरी भाजत होता. त्याने मला ओळखले. त्याच्या जवळचे कंद खाल्ले आणि त्या झोपडीत मुक्काम केला”, असे कथन या पुस्तकात आहे.