महाराष्ट्राच्या राजकारणात मी इतका गोंधळ आणि इतकी प्रतारणा आजपर्यंत पाहिलेली नाही. कोण कोणासोबत जात आहे आणि कोण सत्ता स्थापन करत आहे, विरोधी पक्षात कोण बसत आहे यावर इतका गोंधळ मी इतक्या वर्षाच्या राजकारणात पाहिलेला नाही असा संताप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. राज ठाकरे पाच दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असून आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, यावेळी त्यांनी भाजपा-शिवसेनेची युती तुटण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या मुद्द्यावरही भाष्य केलं. भाजपा-शिवसेना युतीमध्ये १९८९ साली मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्यूला ठरला होता याची आठवणही त्यांनी करुन दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“तुम्ही युती, आघाडी करुन निवडणुका लढवता, आश्वासनं देता आणि मतदार दोन-दोन तास उभं राहून मतदान करतात. ते केल्यानंतर निकाल लागतो तेव्हा कोणी सकाळी जाऊन राज्यपालांकडे शपथविधी करतं. मग भाजपा, राष्ट्रवादी एकत्र येतात. दोन तासात फिस्कटतं, त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येतात. मला ही गोष्ट कळलेलीच नाही,” अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

राज ठाकरेंचा मोठा निर्णय! मनसेची नागपूर कार्यकारिणी बरखास्त; नव्या तरुणांना दिली जाणार संधी

“मी आणि अमित शाह एका खोलीत बसलो होतो, आम्हाला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देणार म्हणाले हे कुठून आलं? १९८९ साली मातोश्री किंवा हॉटेलवर झालेल्या बैठकीत बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासह दोन्ही पक्षातील इतर नेते उपस्थित होते. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असा फॉर्म्यूला त्यावेळी ठरला होता. आता त्याप्रमाणे १९९५ ते १९९९ मध्ये युती सरकारच्या काळात शिवसेनेचे आमदार जास्त होते. त्यावेळी भाजपाने मुख्यमंत्रीपदावर दावा केल्याचं मला आठवत नाही. १९९९ अशी गोष्ट झाली होती. पण, मग जर हा फॉर्म्यूला ठरला आहे, तर निकालानंतर अचानक काय सांगत आहात? तुम्ही चार भिंतीमध्ये ठरलेल्या गोष्टी जाहीरपणे का सांगितल्या नव्हत्या?,” अशी विचारणा राज ठाकरेंनी केली.

पुढे ते म्हणाले “जर त्यावेळी उद्धव ठाकरे व्यासपीठावर असताना नरेंद्र मोदी, अमित शाह हे देवेंद्र फडणवीस पुढील मुख्यमंत्री होतील असं सांगत होते, तर तेव्हाच आक्षेप का नाही घेतला? निवडणुका झाल्या, निकाल लागले आणि मग यांना आठवलं. लोकांनी काय फक्त खेळ पाहत राहायचं का? दोन तास रांगेत, उन्हात उभं राहून मतदान करायचं आणि हे वाटेल तशी प्रतारणा करणार. त्यामुळे हा प्रश्न फक्त विदर्भापुरता मर्यादित नाही, तर महाराष्ट्राचा आहे. ज्या लोकांनी मतदान केलं आहे, त्यांचा अपमान केला आहे. या सर्व गोष्टी त्यांच्यासमोर घेऊन जाणं महत्त्वाचं आहे”.

राजकारणाची पातळी खालावण्यासाठी कोण जबाबदार? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “इतक्या प्रकारे अपमान केल्यानंतरही लोक जेव्हा त्यांनाच मतदान करतात, तेव्हा आपण केलं ते बरोबर आहे असं त्यांना वाटतं. लोकांनी यांना शासन करणं, निवडणुकीत धक्का देण्याची गरज आहे, तेव्हाच हे सुधारतील. जर अशाप्रकारे अपमान होत असेल तर वठणीवर आणलं पाहिजे”.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray on maharashtra politics shivsena uddhav thackeray bjp amit shah ncp congress nagpur sgy
First published on: 19-09-2022 at 12:44 IST