नागपूर : वाघांचा तो हक्काचा अधिवास. याच अधिवासात त्यांचा कायम मुक्काम. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्याही अधिक. पर्यटक येतात, डोळेभरुन त्यांना पाहतात आणि छायाचित्र घेऊन परत जातात. मात्र, नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्रप्रकल्पात आक्रितच घडले. वाघांच्या या घनदाट अधिवासात पर्यटकांचे वाहनच बंद पडले. सोबतची इतर वाहने निघून गेलेली आणि अंधार पडायला लागलेला. तब्बल दोन तास ते अक्षरश: जीव मुठीत घेऊन बसले.
पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात मंगळवारी, २० मे रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास चोरबाहूली प्रवेशद्वारातून पर्यटकांची वाहने आत गेली. यातील एका वाहनात किशोर खर्डे, त्यांची पत्नी आणि त्यांचा मित्र जावेद अहमद यांच्यासह तिघे जण जंगल सफारीसाठी गेले होते. पेंचमध्ये सायंकाळी साडेपाच वाहताच्या सुमारास त्यांचे वाहन कोर एरियामधील कंपार्टमेंट क्रमांक ९८ जवळ थांबली. जिप्सी ड्रायव्हर आणि गाईडने वाहन सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण ते सुरूच झाले नाही. त्या भागात पर्यटकांना घेऊन जाणारी इतर वाहनेही सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रवेशद्वारावरून निघून गेली होती. यामुळे त्यांना इतर पर्यटक वाहनांकडून मदत मिळू शकली नाही.
उमरेड-कऱ्हांडला व्याघ्रप्रकल्पात काही महिन्यांपूर्वी ‘एफ-२’ वाघीण आणि तिच्या पाच बछड्यांना पर्यटक वाहनांची अक्षरश: कोंडीत पकडल्यामुळे न्यायालयाने वनखात्याला चांगलीच चपराक लगावली. त्यामुळे वनखात्याने जंगलात मोबाईल नेण्यास बंदी घातली. एका अभयारण्यात घडलेल्या या प्रकारामुळे राज्यातील जवळजवळ सर्वच अभयारण्यात हा नियम लागू करण्यात आला. त्यामुळे पेंचमध्ये अडकलेल्या या पर्यटकांना तसेच गाईड व जिप्सीचालकांना मदतीसाठी कुणाशीही संपर्क साधता आला नाही. सूर्य मावळतीला आल्यानंतर ते सूर्यास्तापर्यंत वाघच नाही तर इतरही वन्यप्राण्यांच्या हालचाली वेगवान होतात. त्यामुळे वाहनाच्या खाली उतरुन प्रवेशद्वारापर्यंत पायी देखील जाता येईना. वाघांचा अधिवास आणि खुले पर्यटक वाहन यामुळे त्या वाहनातील पर्यटकांमध्ये चांगलीच भीती निर्माण झाली.
जसजसा अंधार वाढत गेला तसतशी पर्यटकांची चिंताही वाढू लागली. त्यातही पर्यटक किशोर खर्डे यांच्या पत्नीला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. अशा परिस्थितीत, मदतीची वाट पाहत खुल्या वाहनात बसणे त्याच्यासाठी खूप कठीण होत होते. दरम्यान, सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास प्रवेशद्वारावरील वनकर्मचाऱ्यांना पर्यटकांच्या ११ वाहनांपैकी केवळ दहाच वाहन परत आले. एक वाहन परतच आले नाही हे लक्षात आले. त्यावेळी वनकर्मचाऱ्यांच्या पथकाने जंगलात शोध सुरू केला. जंगलात थांबवलेली जिप्सी देखील शोध पथकाला दिसत नव्हती, कारण ती उंच गवताने झाकलेल्या जागेत उभी होती. अशा परिस्थितीत नादुरुस्त पर्यटक वाहन शोधणे कठीण होत चालले होते. अखेर रात्री साडेआठ वाजता शोध पथक पर्यटकांच्या नादुरुस्त वाहनाजवळ पोहोचले. त्यानंतर पर्यटकांना प्रथम जंगलातून बाहेर काढून गेटवर नेण्यात आले. वन्यजीवप्रेमींच्या मते, जंगल सफारीदरम्यान गाईड, जिप्सी चालक आणि पर्यटकांना मोबाईल फोन बाळगण्यास मनाई आहे. परंतु अशा परिस्थितींना तोंड देण्यासाठी, मार्गदर्शकाला सर्च लाईट आणि वॉकी टॉकी प्रदान केले पाहिजेत.