अमरावती : राष्‍ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अमरावती शहरातील छायानगर परिसरात छापेमारी केली आहे. या ठिकाणाहून एका संशयित युवकाला चौकशीसाठी ताब्‍यात घेण्‍यात आल्‍याची माहिती आहे. या युवकाला राजापेठ पोलीस ठाण्‍यात आणण्‍यात आले असून त्‍याची चौकशी करण्‍यात येत आहे.

नागपुरी गेट पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील छायानगर परिसरातील एका घरावर एनआयएच्‍या पथकाने स्‍थानिक पोलिसांच्‍या मदतीने काल मध्‍यरात्रीनंतर छापा घातला. या ठिकाणाहून एका २६ वर्षीय युवकाला ताब्‍यात घेण्‍यात आले. मुसाईद असे या युवकाचे नाव आहे. हा संशयित युवक पाकिस्‍तानातील संघटनेशी संबंध ठेवून आहे का, त्‍याला पाकिस्‍तानमधून फोन आले का, याची चौकशी केली जात असल्‍याचे सूत्रांनी सांगितले. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. मात्र, याबाबत एनआयएने अधिक तपशील दिलेला नाही. तर स्थानिक पोलिसांनी याबाबत गुप्तता पाळली आहे. एनआयए सारख्या राष्ट्रीय पातळीवरील तपास यंत्रणा कारवाई करत असताना स्थानिक यंत्रणेला फारशी कल्पना देत नसल्याचे आजवर दिसून आले आहे. तपासाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

हेही वाचा…‘रामगिरी’ला ‘देवा’भाऊची प्रतीक्षा; आता लवकर या…

हा संशयित युवक पाकिस्‍तानातील कुठल्‍या दहशतवाद्यांशी संपर्क ठेवून होता का, त्‍याच्‍याशी पाकिस्‍तानातून कुणी संपर्क साधला, तो कुठल्‍या संघटनेशी संबंधित आहे का, याची चौकशी केली जात आहे. या प्रकरणात अत्‍यंत गुप्‍तता पाळण्‍यात येत आहे. राज्‍यात यापुर्वी अनेक ठिकाणी एनआयएने छापेमारी केली आहे. देशविघातक कारवाया करणा-या संघटनांमध्‍ये सहभाग असल्‍याच्‍या संशयावरून ऑक्‍टोबर महिन्‍यात एनआयएने राज्‍यात छत्रपती संभाजी नगर, जालना आणि मालेगाव येथील काही तरूणांना ताब्यात घेतले होते.

हेही वाचा…‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्‍या वर्षी डिसेंबरमध्‍ये एनआयएच्‍या पथकाने अचलपूर येथील अकबरी चौक परिसरातील एका घरात पोहचून युवकाला ताब्‍यात घेतले होते. या युवकाच्‍या हालचालींवर राष्‍ट्रीय तपास संस्‍था लक्ष ठेवून होती. एनआयएने अमरावतीत यापुर्वीही अनेकवेळा कारवाई केली आहे. येथील औषधी व्‍यावसायिक उमेश कोल्‍हे यांची २१ जून २०२२ रोजी हत्‍या करण्‍यात आली होती. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्‍यात आला होता. या हत्येचे षडयंत्र, संघटनांचा सहभाग आणि आंतरराष्ट्रीय संबंध याच्‍या संपूर्ण तपासाची जबाबदारी ही एनआयए कडे सोपविण्‍यात आली होती. उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना एनआयएच्‍या ताब्यात देण्यात आले होते. हे संपूर्ण प्रकरण एनआयए हाताळत आहे.