वर्धा: योग या विद्येस प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे प्रयत्न सूरू झाल्यानंतर आयुर्वेद हे प्राचीन शास्त्र पुढे यावे म्हणून केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. २०१४ मध्ये सत्तेवर येतात मोदी सरकारने स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन केले. या मंत्रालयामार्फत विविध उपक्रम सूरू असतानाच दिन विशेष म्हणून आयुर्वेदचे स्थान आता अधोरेखित करण्यात आले आहे.
केंद्र शासनाने २३ सप्टेंबर हा दिवस आयुर्वेद दिवस म्हणून देशभर साजरा केला जाणार असे जाहीर केले. पूर्वी दिवाळीत धनतेरसला आयुर्वेद दिन निश्चित करण्यात आला होता. पण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर या महिन्यात तो कधीतरी साजरा होई. वार्षिक तारीख निश्चित नव्हती. आयुष मंत्रालयाने असे नमूद केले की, येत्या दशकात धनतेरसची तारीख बदलत राहील. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिवस आयोजित करण्यास अडचणी येतील. ही विसंगती दूर करण्यासाठी जागतिक उत्सवासाठी बदल आवश्यक ठरतो. म्हणून आयुष मंत्रालयाने योग्य पर्याय निवडण्यासाठी समिती स्थापन केली. समितीने चार तारखा सुचविल्या. त्यात २३ सप्टेंबर या दिवसास पसंती मिळाली. ही तारीख शरद ऋतुतील विषववृत्ताशी जुळते. दिवस व रात्र जवळपास समान असतात. ही खगोलीय घटना निसर्गातील संतुलनाचे प्रतीक ठरते. मन, शरीर व आत्मा यातील समतोल राखण्यावर भर देणाऱ्या आयुर्वेदिक तत्वज्ञानाशी पूर्ण जुळते.
आयुर्वेदास प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि निरोगीपणात महत्वाची भूमिका बजावणारी वैज्ञानिक, पुराव्यावर आधारित समग्र औषध प्रणाली म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी आयुर्वेद दिन साजरा होणार. जागतिक स्तरावर आयुर्वेद दिन साजरा करण्याची व त्याचे पालन करण्याची वृत्ती वाढावी म्हणून २३ सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली असल्याचे, आयुष मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. नागरिक, आरोग्य व्यावसायी, शैक्षणिक संस्था, आंतरराष्ट्रीय संस्था यांनी २निसर्गासोबत संतुलन राखत जीवन जगण्याचे तत्व हाच आयुर्वेद शास्त्राचा सार आहे. २३ सप्टेंबर याच दिवशी आयुर्वेद दिन सोहळ्यात सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही तारीख निश्चित करण्यात आल्याने दरवर्षी दिवाळीत वेगवेगळ्या तारखेस साजरा केल्या जाणारा आयुर्वेद दिनाचा घोळ यामुळे संपुष्टात येणार, अशी भावना आयुर्वेद क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करतात.