नागपूर : देशाला स्वातंत्र्य कुणामुळे मिळाले अशी चर्चा आपल्याकडे चालते. परंतु, खरे पाहिले तर ते कुणा एकामुळे मिळाले नाही. १८५७ पासून स्वातंत्र्याचे प्रयत्न सुरू झाले. तेव्हा सगळीकडे स्वातंत्र युद्धाचा आगडोंब उसळला आणि ती आग कधीच शांत झाली नाही. ती प्रेरणा सतत चालत राहिली. अनेक प्रकारचे प्रयत्न झाले म्हणून आपल्याला स्वातंत्र मिळाले, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
नचिकेत प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित आणि ज्येष्ठ संघ स्वयंसेवक रामचंद्र देवतारे यांच्या ‘संघ जीवन – भाग १ व २’ या दोन ग्रंथांचे प्रकाशन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याहस्ते शुक्रवारी झाले. शिक्षक सहकारी बँक सभागृहातील कार्यक्रमाला नचिकेत प्रकाशनचे श्रीनिकेतन सांबरे, रामचंद्र देवतारे उपस्थित होते.
सरसंघचालक पुढे म्हणाले की, संघाचे काम हे लाखो स्वयंसेवकांनी जीवन झिजवल्याने वाढते. संघाची दिशा ही सामूहिक विचार मंथनातून ठरते. संघ जे बोलतो आणि करतो ते सामूहिक सहमतीतून असते. अनेकदा सज्जन माणसांच्या वाट्याला त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टींचे श्रेय येत नाही. तर, काही लोकांच्या भाग्यात थोडेफार केले तरी भरपूर असते. ज्यांच्या हयातीत देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यांच्या खात्यात त्याचे श्रेय जाणार यात काहीही वावगं नाही. मात्र, ज्यांचा यात वाटा नाही त्यांच्या डोक्यावर श्रेय आले तर अहंकार येतो. मिळालेले श्रेय पचवण्याइतकी खोली असेल तरच त्यांना ते श्रेय पचते. सगळ्यांनी मिळून केलेले ते काम असते. प्रत्येकाचा त्यात वाटा असतो हे विसरून चालणार नाही.
संघाविषयी माहिती नसताना चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकाराने बोलणारे लोक खूप आहेत. मात्र, असे बोलणाऱ्या लोकांनी आमचे काम पाहिल्यावर त्यांची भूमिका बदलते. त्यांना संघाकडून खूप शिकायला मिळाले असे ते म्हणतात. आपलेपणाचा परिघ वाढवत राहणे हेच स्वयंसेवकाचे काम आहे, असेही डॉ. भागवत म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवतारे यांनी तर सूत्रसंचालन उल्हास इटनकर यांनी केले.
सरकारकडूनच सर्व अपेक्षा का?
समाजामध्ये उपेक्षा अजूनही आहे. मी आणि माझे कुटुंब याच्या बाहेर जाऊन माझा शेजार, माझ्या समाजातील दुर्बल घटकाचा विचार केवळ सरकारने करावा का? असा प्रश्नही डॉ. भागवत यांनी केला. ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपल्या ताकदीनुसार सर्वांनी यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले.