पारसी समाजाची स्मशानभूमी वनांचा ऱ्हास आणि गिधाडांची घटती संख्या बघता नागपुरातील पारसी समाजाने १५० वर्षांपूर्वीच अत्यसंस्काराच्या पारंपरिक ‘वेल ऑफ सायलेन्स’ पद्धतीला फाटा देत त्याऐवजी थेट दफनविधीचा पर्याय स्वीकारला. आता देशभरात सर्वत्र हीच पद्धत स्वीकारण्यात आली आहे. पारसी समाजामध्ये ‘अग्नी’ ला पवित्र मानले जाते. ‘अग्यारी’मध्ये (मंदिर) अखंड ज्योत तेवत ठेवण्यात येते. मानवी मृतदेहाला महत्त्व नसते. त्यामुळे त्याची यात्रा काढली जात नाही. अग्नी किंवा थेट जमिनीतही पुरवले जात नाही. लाकडाच्या पेटीत मृतदेह ठेवून दफन केला जातो. अंतिम संस्कारासाठी फार पूर्वी ‘वेल ऑफ सायलेन्स’ आणि दफनविधी असे दोन्ही पर्याय स्वीकार्य होते, परंतु नागपुरातील पारसी समाजाने ‘वेल ऑफ सायलेन्स’ ही पद्धती कधीच मोडीत काढली होती. पारशी समाज मुंबई आणि गुजरातमधून सुमारे १५० वर्षांपूर्वी नागपुरात आला. नागपूरचे राजा भोसले यांनी त्यांना स्मशानभूमीकरिता सेमीनरी हिल्स येथे भूखंड दिला, परंतु समाजाने येथे ‘वेल ऑफ सायलन्स’ तयार केली नाही. १९९७ मध्ये आरामदाह (स्मशानभूमी) उभारण्यात आले, परंतु त्यापूर्वीच ही जमीन समाजाकडे हस्तांतरित करण्यात आली होती. रेल्वे अपघातात मरण पावलेल्या चार पारसी लोकांचे मृतदेह १८९१ ला येथे दफन केल्याची नोंद आहे. ‘आमरामदाह’मध्ये समानता श्रीमंत असो किंवा गरीब, उद्योजक असो किंवा कर्मचारी ‘आरामदाह’मध्ये सर्वासाठी समानता आहे. नागपूर पारसी पंचायतकडे ‘आरामदाह’चे व्यवस्थापन आहे. मृतदेह पुरवण्यासाठी आधीच दोन ते तीन खड्डे तयार करून ठेवले जातात. येथे कुणालाही पसंतीने जागा दिली जात नाही. बालकांना आणि वयस्कांना मात्र वेगवेगळी जागा आहे. दफनविधीपूर्वी मृतदेहाला आंघोळ घालण्याची येथे व्यवस्था आहे. तसेच प्रार्थनागृह देखील आहे. जोरास्ट्रीयन-धर्म -इराणमधील पारस या भूप्रदेशावर जोरास्ट्रीयन धर्माचे नागरिक राहत होते. स्थानिक राजाच्या अत्याचारामुळे ते संजान बंदरमार्गे गुजरातमध्ये आले. त्यांनी गुजराती भाषा आणि संस्कृतीचा स्वीकार केला. या समाजाची मूळ भाषा जुनी पर्शियन आहे. गुजरातमधून हा समाज देशभर परसला. सध्या नागपुरात २०० कुटुंब असून त्यांची लोकसंख्या ६०० च्या आसपास आहे. या धर्मात आत्मा पवित्र मानला जातो. ‘दखमा’ पूर्वीच्या काळात घनदाट जंगलात आरामदाह राहत असे. तेथे विहीर असायची आणि विहिराच्या तोंडावर लोखंडी सळाख टाकलेली असायची. त्यावर मृतदेह उभे ठेवले जात असते. काही क्षणात गिधाड मृतदेहावरील मांस नाहीसे करायचे. त्यानंतर उरलेले अवशेष जुन्या लाकडाच्या शवपेटीत ठेवून दफन केले जात होते. या प्रथेला ‘दखमा’ म्हणतात, परंतु कालांतराने जंगल कमी झाले. गिधाड देखील दिसेनासे झाले. त्यामुळे ही प्रथा बंद करण्यात आली आहे. मुंबईमध्ये बरेच दिवस ही प्रथा होती. मात्र, आता तेथेही बंद झाली आहे. नागपुरात ही प्रथा कधीच नव्हती. नागपुरात आधीपासून शवपेटीत मृतदेह ठेवण्यात येते. पेटीला दोन बाजूंनी हूक असतात. ती पेटी खड्डय़ात ठेवण्यात येते. ओळखीसाठी तेथे एक दगड ठेवला जातो. त्याला क्रमांक दिला जातो, असे माजी खासदार गेव्ह आवारी म्हणाले.