नागपूर : काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात २७ नागरिक ठार झाले. त्याचा सुड उगवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. त्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य बालिशपणाचे असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार)नेते व राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी केली. ते नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
राहुल गांधी यांचे वक्तव्य बालिश आणि दुर्देवी असल्याचे म्हटले आहे. तसेच पाकिस्तानातील दहशतवाद्यांना दिलेल्या प्रत्युत्तरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याने अशी अपरिपक्व विधाने करणे दुर्दैवी आहे. अशा प्रकारच्या विधानांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्र सरकारचे नुकसान होत नाही, तर त्यामुळे केवळ काँग्रेस आणि राहुल गांधींचे नुकसान होते. आज देश एकजूट आहे आणि सर्व खासदार सरकारच्या पाठीशी उभे आहेत. अशा वेळी असे वक्तव्य करणे खेदजनक आहे, असेही पटेल म्हणाले.
जेव्हा सर्व जाती, वर्ग आणि पक्षीय पंक्तीचे लोक दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी एकत्र येतात, अशावेळी विरोधी पक्षनेते बेजबाबदार विधाने करतात. त्यामुळे काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनाही त्यांच्या नेतृत्वाबद्दल पश्चात्ताप करावा लागतो.
पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याबद्दलची आगाऊ सूचना देण्यात आली. याबाबत पटेल म्हणाले, जर आपण बदला घेऊ असे विधान केले तर याचा अर्थ आम्ही शत्रूला आधीच सूचना दिली असे होते काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी आधीच सांगितले आहे की, भारत पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देईल, याचा अर्थ प्रत्येक तपशील उघड करण्यात आला असे होते काय?
राहुल गांधी यांनी आत्मपरिक्षण केले पाहिजे. जेव्हा सर्व जाती, वर्ग आणि पक्षीय पंक्तीचे लोक दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी एकत्र येत आहेत, तेव्हा विरोधी पक्षनेते बेजबाबदार विधाने करतात. काँग्रेस नेत्यांनाही त्यांच्या नेतृत्वाबद्दल पश्चात्ताप करावा लागतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
भुजबळांबाबत निर्णय पक्षाचा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात सामील करण्यासाठी डिसेंबर महिन्यात आग्रह केला होता, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ केले. त्यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळात समावेश करण्याबाबत पक्षाध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मी कार्यकारी अध्यक्ष म्हणून निर्णय घेतला. आम्ही लॉबिंग किंवा इतर पक्षांतील कोणी सांगितल्यामुळे मंत्र्यांची नियुक्ती करत नाही, असे ते म्हणाले.