भारत सासणेंचे नाव आघाडीवर; अवचट, गोडबोले, देखणे यांच्या नावांचाही प्रस्ताव

शफी पठाण

नागपूर : यापुढच्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ‘चालता- बोलता’ हवा, अशी अपेक्षा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी नाशिकच्या संमेलनात व्यक्त केली होती. ती अपेक्षा लगेच उदगीरच्या  संमेलनात पूर्ण होणार असल्याचे संकेत आहेत. संमेलनाचा अध्यक्ष निवडण्यासाठी २ जानेवारी रोजी उदगीर येथे महामंडळाची बैठक होत असून या बैठकीत  प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांच्या नावावर अध्यक्षपदासाठी एकमताने शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.

 मुंबई, पुणे आणि नागपूर या महामंडळाच्या तीन घटक संस्थांनी अध्यक्षपदासाठी जी नावे सुचवली आहेत त्यात सासणे यांचे एक नाव सारखे आहे. याशिवाय महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या ‘मनातील नाव’ही सासणे हेच असल्याने तेच अध्यक्षपदी निवडले जातील, अशी साहित्य वर्तुळात चर्चा आहे. सासणे यांच्यासोबतच अनिल अवचट, अच्युत गोडबोले, डॉ. रामचंद्र देखणे यांचीही नावे चर्चेत आहेत. मुंबईच्या संस्थेने भारत सासणे व प्रवीण दवणे यांची नावे सुचविल्याची माहिती आहे. छत्तीसगडच्या संस्थेने अनिल अवचट यांचे नाव पुढे केले आहे तर पुण्याच्या महाराष्ट्र   साहित्य परिषदेकडून जी तीन नावे महामंडळाला पाठवण्यात आली आहेत त्यात सासणे यांच्यासोबतच अनिल अवचट, अच्युत गोडबोले, डॉ. रामचंद्र देखणे यांचीही नावे आहेत. याआधीचे  लागोपाठ तीन संमेलनाध्यक्ष निवडताना  महाराष्ट्र  साहित्य परिषदेने जे नाव सुचवले तेच अंतिम झाले आहे. यावेळीही पुण्याच्या यादीत सासणे यांचे नाव आहेच. त्यामुळे सासणे यांचे पारडे जड असल्याचे स्पष्ट होत आहे.

एकमताने निवड होण्याची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाले पाटील स्वत: सासणे यांच्या बाबतीत आग्रही असल्याचे कळते. महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने ठाले पाटलांच्या कार्यकाळातील हे शेवटचे संमेलन आहे. त्यामुळे त्यांना न दुखवता अध्यक्ष निवडला जावा, अशी भूमिका अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेतील सर्व प्रतिनिधींनी घेतल्याने येत्या २ जानेवारीला सासणे यांचे नाव अध्यक्षपदासाठी एकमताने निवडले जाईल, अशी खात्रीदायक माहिती आहे.