बुलढाणा : ‌पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देशासह बुलढाणा जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात मात्र पंतप्रधानाचा ७५ वा जन्मदिन राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्यात आला. उच्च शिक्षित बेरोजगार युवकांनी चहा, वडापाव, समोसा आणि फळांची दुकानें थाटून संताप वजा निषेध अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे.

चिखली शहर व चिखली तालुका युवक काँग्रेसच्या वतीने चिखलीचा केंद्रबिंदू असलेल्या जयस्तंभ चौकात करण्यात आलेले हे अभिनव आंदोलन लक्षवेधी ठरले. उच्च शिक्षित बेरोजगार युवकांनी थाटलेल्या या स्टॉलवर खवैय्या ग्राहकांची चांगलीच गर्दी झाल्याचे दिसून आले.

दीर्घ कालावधीनंतर युवक काँग्रेसचे आंदोलन दणकेबाज ठरले असून त्यात संघटनेची जुनी आक्रमकता दिसून आली. जयस्तंभ चौक येथे मोठ्या संख्येने तरुणांनी उपस्थित राहून वाढत्या बेरोजगारी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. युवकांनी पदवी समारंभाचा पोशाख परिधान करून “इंजिनिअर चायवाला”, “एमबीए वडा पाववाला”, “ग्रॅज्युएट फळ विक्रेता” अशा फलकांसह प्रतिकात्मक आंदोलन केले. या माध्यमातून उच्चशिक्षण घेतल्यानंतरही नोकरीसाठी तरुणांना भटकंती करावी लागते, आणि शेवटी छोट्या-मोठ्या व्यवसायावर पोट भरण्याची वेळ येते, ही वस्तुस्थिती मांडण्यात आली.

दरम्यान, “नोकरी चोर गद्दी छोड”, “स्टॉप वोट चोरी”, “रोजगार द्या अन्यथा सत्ता सोडा” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. सरकारने रोजगार निर्मितीसाठी ठोस धोरण आखावे आणि तरुणांच्या भविष्याशी खेळणे थांबवावे, अशी ठोस मागणी यावेळी करण्यात आली.

शहर अध्यक्ष रिक्की काकडे यांनी सांगितले की, सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील २ कोटी युवकांना रोजगार देण्याची हमी दिली होती. प्रत्यक्षात देशात युवकांच्या बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. उच्च शिक्षण घेऊनही हातात नोकरी नसल्याने युवकांना चहा,वडापाव, फळांची दुकाने टाकावी लागत आहे.

जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या आंदोलनात शहर युवक काँग्रेस अध्यक्ष रिक्की काकडे, तालुका अध्यक्ष अंबादास वाघमारे, शिवराज पाटील, विश्वदीप पडोळ, रोहन पाटील, राहुल चवरे, विधानसभा समन्वयक प्रा.राजु गवई, कुणाल बोंद्रे, माजी अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, विलास कंटूले, जय बोंद्रे, कैलास खराडे, मिलींद पालवे, रामेश्वर भुसारी, संजय गिरी, व्यंकटेश रिंढे, नितीन वाघ, बबलु शेख, सागर साळवे, विकास परराव, सचिन भराड, रोहन गोहर, अमित पवार, क्रिश जोशि, दिलीप अंभोरे, यश गुजर, अविनाश ब्राम्हणे, नितीन गवई, प्रफुल्ल वाकोडे, मंगेश गवई, शेख अजिस, शकील भाई, हाजी शेख, अजिम खान, शिवा म्हस्के आदि पदाधिकारी सहभागी झाले.

रोजगार न मिळणे हे सरकारचे अपयशच : रिक्की काकडे

देशात वाढती बेरोजगारी ही आज सर्वात मोठी समस्या असून शिक्षित तरुणांना रोजगार न मिळणे ही सरकारची अपयशाची कबुली आहे. मागील दहा वर्षांत रोजगाराच्या नावाखाली केवळ खोटे आश्वासन दिले गेले. आज लाखो तरुणांच्या हाताला काम नाही, त्यामुळे त्यांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे. युवकांच्या रोजगारावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्यात आल्याचे, शहराध्यक्ष काकडे यांनी सांगितले.