घटना क्रमांक १ – प्राध्यापक जी. एन. साईबाबाला शिक्षा झाल्याबरोबर तो निर्दोष कसा आहे, हे सांगणाऱ्यांचा महापूर सोशल मीडियावर आला आहे. त्याच्या सुटकेसाठी देशपातळीवर सक्रिय असलेली ‘कमेटी फॉर रिलीज ऑफ द पॉलिटिकल प्रिझनर्स’ ही संघटना सक्रिय झाली असून न्यायव्यवस्था सरकारच्या दबावाखाली आहे असे सांगू लागली आहे.

संभाव्य घटना क्रमांक २ – साईबाबाला निर्दोष सोडा यासाठी अनेक मानवाधिकार संघटना आता एकत्र येतील व स्वाक्षरी मोहीम राबवतील. या मोहिमेला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयोग यशस्वीपणे राबवला जाईल.

संभाव्य घटना क्रमांक ३ – साईबाबाने शिक्षेविरुद्ध वरच्या न्यायालयात अपील केले की, न्यायव्यवस्थेला आवाहन करणारी मोहीम समाजमाध्यमातून जोरदारपणे राबवली जाईल.

प्राध्यापक साईबाबाला गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर पहिली घटना घडायला सुरुवात झाली आहे. उर्वरित दोन घटना नजीकच्या काळात घडणार आहेत. हा अचूक अंदाज नक्षलवाद्यांच्या शहरी भागातील कार्यपद्धतीवर आधारलेला आहे. शिक्षा देणाऱ्या न्यायालयावर सरकारच्या दबावात आहे, अशी टीका करायची आणि प्रकरण वरिष्ठ न्यायालयात गेले की गुन्हेगार निर्दोष आहे, असा कांगावा उभा करून सहानुभूती मिळवायची, असा दुटप्पीपणा ही चळवळ सतत करत आली आहे. जंगलात राहून शस्त्रांच्या मदतीने सरकारविरोधात लढा देणाऱ्या नक्षलवाद्यांचे शहरातील समर्थकांचे जाळे लोकशाहीच्या मार्गाने सरकारवर सतत दबाव आणत असते. एखादा जहाल नक्षलवादी अटकेत असला किंवा न्यायालयाने त्याला शिक्षा ठोठावली की या फ्रंट संघटना वर उल्लेखलेल्या पद्धतीने सक्रिय होतात. मात्र याच संघटना नक्षलवादाच्या आरोपावरून गेली अनेक वर्षे तुरुंगात खितपत पडलेल्या जंगलातील आदिवासींसाठी अशा पद्धतीने सक्रिय होताना कधीच दिसत नाहीत.

आदिवासींच्या हिताचे कारण देत ही चळवळ उभी आहे, तो कारागृहात असला तरी या संघटना मौन साधतात. कारण तो बाहेर येऊन काही उपयोगाचा नसतो. चळवळीत सक्रिय असलेला एखादा ‘हार्डकोअर’ कायद्याच्या कचाटय़ात अडकला की या संघटना सक्रिय होतात, कारण त्याला सोडवणे चळवळीच्या हिताचे असते, आदिवासीला नाही ही नक्षलवाद्यांची कार्यपद्धती आहे व त्याचेच दर्शन गेल्या ३० वर्षांत वारंवार होत आले आहे. जंगलात राहणारे व काही हजारांच्या संख्येत असलेले सशस्त्र नक्षलवादी बाहेरून मिळणाऱ्या मदतीशिवाय राहूच शकत नाहीत. त्यांना ही मदत फ्रंट संघटनांकडून होते व साईबाबा आजवर तेच करत होता. ह्य़ा फ्रंट संघटना समाजमाध्यमांवर कमालीच्या सक्रिय आहेत. साईबाबाला अटक होताच या संघटनांनी तो निर्दोष कसा हे दर्शवण्यासाठी स्वाक्षरी व तपासाधिकाऱ्याला पत्रे पाठवण्याची मोहीम तीन वर्षांपूर्वी राबवली होती. तेव्हा या प्रकरणाचा तपास करणारे सुहास बावचे यांना जगभरातून हजारो पत्रे आली. गंमत म्हणजे, त्यातला मजकूर तंतोतंत सारखा होता. या फ्रंट संघटनांमधील एकाने मजकूर तयार करायचा व तो सर्वाना पाठवायचा आणि ज्यांना मिळाला त्यांनी पत्र तयार करून पाठवून द्यायचे. यातून आपसूकच दबाव निर्माण करता येतो. हे तंत्र नक्षलवादी कायम वापरत आले आहे. साईबाबाला शिक्षा झाल्याबरोबर त्याच्या पत्नीच्या नावाने जारी केलेला एक संदेश सर्वत्र फिरू लागला. यात न्यायालये सरकारच्या दबावाखाली काम करतात अशी टीका होती. या मजकुराची भाषा नक्षलवादी वापरतात अगदी तशी होती. नक्षलवाद्यांच्या फ्रंट संघटनांमध्ये शेकडो तरुण सक्रिय आहेत. त्यांच्याकडून समाजमाध्यमांवर सध्या साईबाबाच्या निमित्ताने सरकारी जुलूम कसा केला जात आहे हे रंगवून सांगितले जात आहे. नक्षलवाद्यांच्या फ्रंट संघटनांमध्ये मानवाधिकाराच्या नावाने अनेक गट सक्रिय आहेत. हे गट पोलिसांच्या गोळीबारात नक्षलवादी वा त्यांचे जंगलातील समर्थक ठार झाले की लगेच सत्यशोधन समिती स्थापन करून घटनास्थळी जातात व २४ तासांच्या आत सरकारला दोषी ठरवणारा निष्कर्ष जाहीर करून मोकळे होतात. नक्षल्यांनी एखाद्या आदिवासीला ठार केले की हे गट शांत असतात. आता साईबाबाला शिक्षा झाल्याबरोबर हे गट सक्रिय झाले असून स्वाक्षरी मोहीम राबवणे, न्यायालयाच्या निकालपत्रात कशा त्रुटी आहेत हे सांगण्यासाठी ठिकठिकाणी कार्यक्रम घेणे, देशातील नामवंतांना या मोहिमेत जाणीवपूर्वक सहभागी करून घेणे आदी कार्यात व्यस्त झाले आहेत. तिसऱ्या घटनेत उल्लेख करण्यात आलेली राजकीय कैद्याबाबतच समिती नक्षलवाद्यांच्या फ्रंट संघटनेचा एक भाग आहे. नक्षलवाद्यांच्या ‘स्ट्रॅटेजी अ‍ॅण्ड टॅक्टीक्स’ या पुस्तकात या समितीची कार्यपद्धती कशी राहील हे विस्ताराने नमूद केले आहे. आता साईबाबाच्या शिक्षेनंतर ही समिती सक्रिय झाली असून ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करायला सुरुवात झाली आहे. या समितीकडून आता साईबाबाचे निर्दोषत्व दर्शवणारी पत्रे तयार करून त्यावर जगभरातील मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जाणार आहेत.

हा या चळवळीच्या कार्यपद्धतीचाच एक भाग आहे. कारागृहात असताना नोंदवही तयार करणे, त्यात रोजचे अनुभव लिहिणे व सुटका होताच त्याचे पुस्तक प्रसिद्ध करणे हे कामसुद्धा या चळवळीत सक्रिय असलेल्या प्रत्येकाकडून केले जाते. आजवर अशी अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. एकूणच चळवळीशी संबंधित व क्रमांक एकचा शत्रू असलेल्या सुरक्षा दल तसेच सरकारशी संबंधित प्रत्येक कृतीवर प्रतिक्रियावादी होत व्यवस्थेविरुद्धचा असंतोष कायम कसा राहील हे बघणे अशीच ही कार्यपद्धती आहे. साईबाबाच्या प्रकरणात सुद्धा तिचे तंतोतंत पालन करणे सुरू झाले आहे.