यवतमाळ : राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. सुधाकरराव नाईक यांचे सुपूत्र अध्यक्ष असलेल्या आणि विद्यमान राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे वडील सचिव असलेल्या पुसद येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयातील अनागोंदीमुळे येथील प्राध्यापक, कर्मचारी सध्या भीषण आर्थिक संकटात सापडले आहेत.
मागील चार महिन्यांपासून येथील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. याशिवाय काही निवृत्त कर्मचार्यांचे भविष्य निर्वाह निधी आणि स्वेच्छानिवृत्तीबाबतचे प्रस्ताव देखील प्रलंबित आहेत. यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना गंभीर आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. व.ना. महिला महाविद्यालयात एक हजाराच्या जवळपास विद्यार्थिनी शिक्षण घेत असून, ३० च्या वर कर्मचारी कार्यरत आहेत.
महाविद्यालयातील प्रा. डॉ. छाया कोकाटे यांच्याकडे ३१ जानेवारी २०२५ पर्यंत कार्यकारी प्राचार्यपदाचा प्रभार होता. त्यांची कारकीर्द वादगस्त राहिल्याचा आरोप येथील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी केला आहे. अनेक प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी प्राचार्य डॉ. कोकाटे यांच्यावर मानसिक त्रास दिल्याचे आरोप करत संस्थाध्यक्ष आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत संस्थाध्यक्षांनी सेवाज्येष्ठतेनुसार प्रा. डॉ. रजनी भोयर यांची कार्यकारी प्राचार्य म्हणून १ फेब्रुवारी २०२५ पासून सहा महिन्यांसाठी नियुक्ती केली.
डॉ. भोयर यांच्या नियुक्तीला अद्यापही विद्यापीठाची मान्यता मिळाली नाही. त्यामुळे महाविद्यालयील प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे. या महिला महाविद्यालयाची गौरवशाली पंरपरा आहे. त्यामुळे महाविद्यालयात कायमस्वरूपी किंवा प्रभारी प्राचार्यांची तत्काळ नियुक्ती करण्याची मागणी प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी केली आहे.
तक्रारीत तथ्य नाही – प्रा. डॉ. छाया कोकाटे
सध्या प्रा. डॉ. रजनी भोयर यांच्याकडे प्राचार्यपदाचा प्रभार आहे. महाविद्यालयातील आपल्या कार्यकाळीतील कामकाजासंदर्भात काही प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे तक्रार केली आहे. मात्र त्या तक्रारीत काहीही तथ्य नाही. त्यात केलेले सर्व आरोप खोटे आहेत. विद्यापीठस्तरावरून त्याची चौकशी सुरू आहे. मी विद्यापीठाला माझे उत्तर दिले आहे, अशी प्रतिक्रिया तत्कालीन प्राचार्य डॉ. छाया कोकाटे यांनी दिली.
प्रभार आहे, पण अधिकार नाही – प्राचार्य डॉ. रजनी भोयर
संस्थाध्यक्षांनी सेवाज्येष्ठतेनुसार आपली कार्यकारी प्राचार्य म्हणून नियुक्ती केली. मात्र काही त्रुटींमुळे या प्रस्तावाला विद्यापीठाकडून मान्यता मिळाली नाही. त्यामुळे स्वाक्षरी करण्याचे अधिकार नसल्याने प्राध्यापक, कर्मचाऱ्यांचे पगारबिल व इतर प्रशासकीय कामकाजात अडचणी येत असल्याचे प्रभारी प्राचार्य डॉ. रजनी भोयर यांनी सांगितले.
अध्यक्ष-सचिव सक्रिय नसल्याचा गैरफायदा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांनी जनता शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली होती. या संस्थेमार्फत पुसद येथे शिक्षणाची गंगा नाईक यांनी आणली. याच संस्थेमार्फत श्रीमती व.ना. महिला महाविद्यालय संचालित केले जाते. मात्र संस्थाध्यक्ष असलेले जय सुधाकर नाईक हे सध्या बंगळूरू येथे वास्तव्यास आहेत, तर सचिव माजी मंत्री मनोहरराव नाईक हे प्रकृती अस्वास्थामुळे सक्रिय नाहीत. त्याचा गैरफायदा घेवून या महाविद्यालयाची रया घालविली जात असल्याचा आरोप प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी केला आहे.