प्रमोद खडसे, लोकसत्ता

वाशिम: जिल्ह्यात १९ ते २३ जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला. सोयाबीन, तुर पिकांसह अंदाजे २९ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिके उद्ध्वस्त झालीत. ३६५ घरांचे नुकसान झाले. मानोरा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बेलोर गावात पाणी शिरले. पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र, कोणताही लोकप्रतिनिधी गावात फिरकला नसल्याने शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. लोकप्रतिनिधींना गावात ‘नो एंट्री’चे फलक लावून शेतकऱ्यांकडून निषेध केला जात आहे.

जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री आणि मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांनी बैठक घेतली. या वेळी केवळ जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे उपस्थित होते. जिल्ह्यातील एकही आमदार, खासदार बैठकीत उपस्थित नसल्याने शेतकऱ्याच्या व्यथा कोण मांडणार, असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा… राज्यातील ४२ हजार कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना कायम करणे.. उर्जामंत्र्यांना काय दिला प्रस्ताव?

जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आधीच पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. उशिरा पेरण्या झाल्या परंतु जुलै महिन्यात पावसाने जिल्ह्यात हाहाकार माजविला. तीन दिवस मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नाची राख रांगोळी झाली. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका मंगरूळपीर, मानोरा व कारंजा तालुक्याला बसला.

हेही वाचा… यवतमाळातील यादव टोळीविरुद्ध मकोका कारवाई; दोघांविरुद्ध एमपीडीए, गुन्हेगारांविरुद्ध पोलीस आक्रमक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९ जुलै रोजी १२ मंडळातील ५२ गावे प्रभावित झाली. २२ जुलै रोजी ५ मंडळातील ५७ गावे प्रभावित झाली तर २३ जुलै रोजी मानोरा व मंगरूळपीर अनुक्रमे ७८ व १८ गावे प्रभावित झाली. मोठ्या प्रमाणावर पिके खरडून गेली. अनेकांच्या घरात पाणी शिरले. जनावरे दगावली, जीवित हानी झाली. अतिवृष्टीमुळे शेतकरी उध्वस्त झाला. त्यातच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड व मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी आढावा बैठक घेतली. या वेळी केवळ जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील एकही आमदार, खासदार मात्र उपस्थित नसल्याने शेतकऱ्याच्या व्यथा कोण मांडणार,असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे.