विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका राज्य दुष्काळात होरपळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्यांवर येणे अपेक्षित होते. मात्र, मेक इन इंडियातून त्यांना वेळ मिळत नाही. आता बैठक घेऊन काही फायदा होणार नसल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. गोंदिया येथे काँग्रेसच्या मोर्चाचे नेतृत्त्व करण्यासाठी विखे पाटील आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे शनिवारी नागपुरात आल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील दुष्काळावर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या बैठकीवर बोलताना विखे म्हणाले की, मराठवाडय़ातील दुष्काळावर उपाययोजना करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. राज्यात मेक इन इंडियाच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधानांना वेळ आहे, पण दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी त्यांना वेळ नाही. मदत जाहीर करा - राणे राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना केंद्र आणि राज्य सरकारचा भर केवळ बैठकींवर आहे, त्यामुळे केवळ बैठकी न घेता मदत जाहीर करा. दिल्लीतील बैठकांमधून काही निष्पन्न होणार नाही, असा आरोप नारायण राणे यांनी केला.