नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदानावर राहुल गांधी यानी अनेक वेळा आक्षेप घेतले. निवडणूक आयोगाकडे तक्रारीही केल्या. मात्र त्यांना आयोगाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. १५ दिवसांपूर्वी त्यांनी मतचोरीचा आरोप केला होता व त्याला निवडणूक आयोगाने उत्तर देण्याऐवजी भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा लेख लिहून उत्तर दिले होते. आता राहुल गांधी यांनी त्यांच्या एक्सवर पोस्ट करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात झालेल्या मतदार नोंदणीबाबत आक्षेप घेतला आहे.
लोकसभेचे खासदार राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात, मतदार यादीत फक्त ५ महिन्यांत ८% वाढ झाली. काही बूथवर २०-५०% वाढ झाली. अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचे वृत्त बीएलओंनी दिले. माध्यमांनी पडताळणी करून पत्त्याशिवाय हजारो मतदारांना उघड केले. आणि निवडणूक आयोग? गप्प – की यात सहभागी. ? असा सवाल केला आहे. ही मत चोरी आहे. म्हणूनच आम्ही मशीन-रीडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज त्वरित प्रसिद्ध करण्याची मागणी करतो, असे राहुल गांधी म्हणतात.
राहुल गांधी यांनी प्रथमच थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. यापूर्वी राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निर्भेळ नसल्याचा आरोप केला होता. त्यांनी विविध वृत्तपत्रांत याविषयीचा लेखच लिहिला. त्यात महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये मॅच फिक्सिंग होण्याची भीती व्यक्त केली होती. त्याला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले होते. त्यांनी पुराव्यांसह सर्व आरोप खोडून काढले. ज्या ३ वृत्तपत्रांत राहुल गांधींचे लेख आले, त्याच ३ वृत्तपत्रांत फडणवीसांचेही लेख छापून आले आहेत. भारत जोडोच्या नावाखाली चालविलेल्या भारत तोडो अभियानात डॉ. मनमोहन सिंग यांनी ठरविलेल्या किती नक्षली संघटना होत्या, याची आठवण करुन दिली होती. महाराष्ट्राच्या विधानसभेत १९ डिसेंबर २०२५ रोजी केलेल्या भाषणाचे त्यांनी स्मरण करुन दिले. एकदा पराभव स्वीकारुन आपण कुठे चुकतो आहोत, जनतेशी आपला कनेक्ट कुठे कमी पडतो, त्यासाठी काय केले पाहिजे, याचा विचार केला तर ते अधिक संयुक्तिक ठरेल, असा सल्ला फडणवीस यांनी राहुल गांधींना दिला. बिहारसह आगामी विधानसभा निवडणुकांच्या पराभवाची कारणेही त्यांना आतापासून तयार करायची आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला होता.