मानवरहित रेल्वे क्रॉसिंग बंद केल्यानंतर नवीन समस्या
नागपूर : भारतीय रेल्वेने देशातील सर्व मानवरहित रेल्वे क्रॉसिंग बंद करून त्याऐवजी रेल्वे भुयारी मार्ग सुरू केले खरे, पंरतु चुकीच्या ‘डिझाईन’मुळे पावसाचे पाणी या मार्गावर साचत असल्याने नागरिकांसमोर एक वेगळीच समस्या निर्माण झाली आहे.
मध्य रेल्वे आणि दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेत एकही मानवरहित रेल्वे क्रॉसिंग नाही. यापैकी काही ठिकाणी रेल्वे उड्डाण पूल तर बऱ्याच ठिकाणी रेल्वे भुयारी मार्ग (अंडरपास) तयार करण्यात आले आहेत. हे अंडरपास चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आले आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्याच्या निचरा होत नाही. हे पाणी भुयारी मार्गाच्या मधोमध साचत आहे. परिणामी, ग्रामीण भागातील लोकांना रेल्वे भुयारी मार्गातून जाणे कठीण झाले आहे. राज्यात इतरत्रही असेच चित्र उद्भवले असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागभीड-चंद्रपूर व गोंदिया रेल्वेमार्गावर भुयारी मार्गाचे (अंडर पास) बांधकाम केले आहे. रेल्वे रुळ ओलांडून रस्ते कायमचे बंद केले आहेत. पण या ठिकाणी साचलेल्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने हे भुयारी मार्ग नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. नागभीड तालुक्यातील गंगासागर हेटी ते ब्रम्हपुरी तालुक्यातील किटाडी या मार्गावर बांधण्यात आलेल्या जीसीएफ-९३ या क्रमांकाच्या अंडरपासमध्ये मागील अनेक दिवसांपासून पावसाचे पाणी साचलेले आहे, याकडे दक्षिण-पूर्व -मध्य रेल्वे बिलासपूर झोन सल्लागार समितीचे सदस्य संजय गजपुरे यांनी लक्ष वेधले.
पासवाळ्यात दरवर्षीच अशी स्थिती उद्भवत असल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली. हा संपूर्ण परिसर घनदाट जंगलाचा आहे. या भागात वाघ, बिबट व इतर वन्यप्राण्यांचा वावर आहे. भुयारी मार्गात साचलेल्या पाण्यात वन्यप्राण्यांचाही जीव जाऊ शकतो. त्यामुळे रेल्वेने भुयारी मार्गातील पाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, असेही ते म्हणाले.
यासंदर्भात दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक विकासकुमार कश्यप म्हणाले, अतिवृष्टीमुळे पाणी साचत आहे. पाणी काढण्याची व्यवस्था रेल्वे करीत आहे. गुरुत्वाकर्षणाचा केंद्रबिंदू पुलाच्या खाली राहत असल्याने पाणी तेथे साचते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘‘साचलेले पाणी काढण्यासाठी गँगमनला तैनात करण्यास सांगण्यात आले आहे. पम्प लावून पाणी काढण्यात येत आहे. ही मोहीम महिनाभर चालणार आहे.’’ – विकास कुमार कश्यप, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे.