नागपूर: भारतीय जनता पक्षाची मातृ संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये संघ आणि भाजपमध्ये काहीसा दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती. मात्र, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाच्या नागपूर येथील मुख्यालयाला भेट दिली. त्यावरून संघ आणि भाजप यांच्यात सर्व सुरळीत असल्याचे बोलले जाते. आता संघाने त्यांच्या आगामी योजनांसाठी देशभरातील प्रचारकांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक का महत्त्वाची आहे ते समजून घेऊया…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय स्तरावरील प्रांत प्रचारक बैठक यावर्षी राजधानी दिल्ली येथे ४, ५ आणि ६ जुलै २०२५ रोजी आयोजित केली आहे. दिल्लीतील ‘केशवकुंज’ संघ कार्यालयात ही बैठक होणार आहे. देशभरातील सर्व प्रांत प्रचारक, सह-प्रांत प्रचारक आणि क्षेत्र प्रचारक या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. संघाच्या आगामी योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून ही बैठक महत्त्वाची मानली जाते. संघाच्या संघटनात्मक रचनेत एकूण ११ प्रदेश आणि ४६ प्रांत निर्माण करण्यात आले आहेत. संघाने प्रेरित विविध संघटनांचे अखिल भारतीय संघटन मंत्री देखील या बैठकीत सहभागी होतील. गेल्या मार्चमध्ये झालेल्या प्रतिनिधी सभेच्या बैठकीनंतर देशभरात एप्रिल, मे आणि जून महिन्यात संघाच्या विविध स्तरांचे प्रशिक्षण वर्ग पूर्ण झाल्यानंतर आगामी योजनेच्या अंमलबजावणीच्या रूपरेषेच्या दृष्टिकोनातून ही बैठक महत्त्वाची मानली जाते.
बैठकीत, अलिकडेच संपलेल्या संघ प्रशिक्षण वर्गांचा अहवाल सादर केला जाऊन त्याचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच आगामी शताब्दी वर्षासाठी नियोजित विविध कार्यक्रमांच्या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. २०२५-२६ या वर्षासाठी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रवास नियोजन यासारख्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. संघ शताब्दी वर्षाचे (२०२५-२६) कार्यक्रम येत्या विजयादशमीपासून म्हणजेच ०२ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होतील आणि पुढील वर्षी विजयादशमी २०२६ पर्यंत सुरू राहतील.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे, सह-सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल, सी.आर. मुकुंद, अरुण कुमार, रामदत्त, आलोक कुमार, अतुल लिमये यांच्यासह सर्व अखिल भारतीय कार्य विभाग प्रमुख, सह-प्रमुख आणि कार्यकारिणीचे सदस्य बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीसाठी सरसंघचालक २८ जून रोजी दिल्लीत पोहोचतील, असे संघाच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.