निर्यातदारांसह उद्योगाला कोट्यवधींचा फटका नागपूर : तालिबानने अफगाणिस्तानावर ताबा मिळवल्यानंतर भारताकडून होणाऱ्या आयात-निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. मुंबईच्या जेएनपीटीवरून अफगाणिस्तानकडे निघालेले नागपुरातील दोनशे कंटेनर परत पोर्टवर आले आहेत. त्यामुळे निर्यातदारांसह कंटेनर डेपोला कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. नागपुरातून दर महिन्याला दोनशे कंटेनर अफगाणिस्तानमध्ये जातात. नागपूरच्या मिहान येथील कॉनकॉरच्या कंटेनर डेपोतून रस्ते मार्ग हे सर्व कंटेनर मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) येथे नेण्यात येतात आणि मग पाकिस्तान येथे पोहचतात. तेथून रस्ते मार्गे ते अफगाणिस्तानकडे जातात. नागपुरातून सर्वाधिक पॉवर ट्रान्समिशन टॉवर अफगाणिस्तानला जातात. देशातील दुसऱ्या क्रमांकाची इंजिनिर्अंरग कंपनी केईसी अफगाणिस्तानला ट्रान्समिशन टॉवर कंटेनरने पाठवत असते. जवळपास दीडशे कंटेनर महिन्याला जातात. विदर्भातील व्यावसायिक तांदूळ, चहा, कॉफी, कापूस, चामड्याच्या वस्तू आदीची निर्यात करतात. दरमहिन्याला दोनशेहून अधिक कंटेनर अफगाणिस्तानकडे जात होते. मात्र तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यामुळे सर्व कंटेनर जेएनपीटीत परत आले आहेत. कॉनकॉरने केईसी कंपनीचे पॉवर ट्रान्समिशन टॉवरचे दीडशे कंटेनर अफगाणिस्तानकडे पाठवले होते. मात्र तेथे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ते परत आले आहेत. इतरही कंटेनर मुंबईच्या जेएनपीटी पोर्टवर परत आले आहेत. - संतोष सिंग, मुख्य प्रबंधक, कॉनकॉर.