नागपूर: तुम्ही जन्म कुठे घेतला, कोणत्या जातीत, धर्मात घेतला यावर काहीही अवलंबून नसते. मात्र प्रत्येकाने योग्य मार्गाने चालावे असे ईश्वराचे वरदान आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी केले. पारधी विकास परिषद विदर्भ प्रांतच्या वतीने पारधी समाजासाठी काम करणाऱ्या संस्थांची एक दिवसीय कार्यशाळा शनिवारी रवी भवन नागपूर येथे संपन्न झाली. कार्यशाळेस उद्घाटक म्हणून जोशी उपस्थित होते. तर विशेष अतिथी म्हणून अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, परिषदेचे मार्गदर्शक प्रदीप वडनेरकर, संयोजक आशिष कावळे, परशराम भोसले उपस्थित होते.
उद्घाटनपर भाषणात भैय्याजी जोशी म्हणाले की, प्रत्येक माणसाला आनंदाने जगण्याचा अधिकार आहे. मग तो दुर्बल असो, सक्षम असो, गरीब वा श्रीमंत असो. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार स्वतः आनंद घ्यावा व इतरांनाही आनंदी ठेवावे. दुर्बल घटकांना सक्षम घटकांनी सर्व प्रकारचे सहकार्य करावे. शिक्षित व अशिक्षित दोघेही पैसा मिळवू शकतात पण पैसे मिळविण्याचे मार्ग वेगवेगळे असू शकतात. त्या सर्व गोष्टींसाठी बुद्धीमत्ता व कौशल्य लागते. आता जगण्यासाठी सर्व व्यवस्था निर्माण झाल्या आहेत. पूर्वी अशा सुविधा नव्हत्या. दळणवळणासाठी वाहन, उदरनिर्वाहासाठी अनेक साधने, उद्योग, कारखाने, छोट्या मोठ्या नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. त्याचा योग्य वापर व्हावा व चांगले जीवन जगावे. यासाठी सर्व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन दुर्बल व वंचित घटकातील पारधी समाजास उन्नत करावे. त्यासाठी सेवा संस्थेतील कार्यकर्त्यांनी त्यांच्यात असलेल्या दैवी गुणांचा व कौशल्याच्या उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.
धर्मपालजी मेश्राम म्हणाले, मला शासनाने वंचित समाजासाठी काम करण्याची संधी दिली. मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो, अगदी शेवटच्या पालावर व बेड्यात गेलो. अजुनही शेवटच्या घटकांपर्यंत शासनाचे लाभ पोहोचले नाहीत ही शोकांतिका आहे. हे चित्र बदलण्यासाठी व या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने व सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप वडनेरकर यांनी केले. कार्यशाळेस विदर्भातून सामाजिक संस्थाचे ४७ प्रतिनिधी आले होते. कार्यशाळेत सामाजिक संस्थांनी आपले कार्य वृत्त सादर केले. कार्यशाळेचा समारोप अतुल मोघे यांनी केला.
