नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अमरावती महानगरच्या वतीने ५ ऑक्टोबरला विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला माजी राज्यपाल दिवंगत रा.सू. गवई यांच्या पत्नी आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई यांना निमंत्रण देण्यात आले आहे. कार्यक्रम पत्रिकेवर त्यांचे नाव असून त्या अमरावतीमध्ये सर्वत्र वाटप झाल्या आहेत. मात्र, यानंतर कमलताईंनी संघाच्या कार्यक्रमाला येण्यास कधीच होकार दिलेला नाही, हे संघाचे षडयंत्र आहे, आपण पक्के आंबेडकरवादी आहोत, असे स्पष्टीकरण दिल्याचे पत्र समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ऐतिहासिक असा विजयादशमी उत्सव नागपूरमध्ये २ ऑक्टोबरला साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर ५ ऑक्टोबरच्या अमरावतीमधील कार्यक्रमाला कमलताई गवई मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याच्या निमंत्रण पत्रिका शुक्रवारी सर्वत्र वाटप झाल्या. रविवारी कमलताईंचे स्वलिखित पत्र प्रसारमाध्यमांवर आले. यात त्यांनी संघाच्या विजयादशमी सोहळ्याला आपण उपस्थित राहणार असल्याची बातमी धादांत खोटी आहे, असे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
पत्रात काय?
संघाच्या विजयादशमी सोहळ्याला आपण उपस्थित राहणार असल्याची बातमी धादांत खोटी आहे. दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टची संस्थापक अध्यक्ष म्हणून आंबेडकरी विचाराने ओतप्रोत आणि देशाच्या संविधानाप्रति माझे घराणे अविरत प्रामाणिक असल्यामुळे ‘आरएसएस’च्या अमरावतीत होणाऱ्या कार्यक्रमाला हजर होणार नाही. सामाजिक जाणिवेला कुठल्याही प्रकारे दु:ख होऊ देणार नाही. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर सर्व भारतातील जनतेने याची नोंद घ्यावी. मला विश्वासात न घेता किंवा लेखी होकार न घेता हे ‘आरएसएस’चे षडयंत्र आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना गवई परिवारातर्फे मन:पूर्वक शुभेच्छा. असे कमलताई गवई यांनी पत्रात नमूद केले आहे.
‘भेट घेऊन कार्यक्रमासाठी आमंत्रित केले’
कमलताईंचे पत्र पुढे आल्यावर अमरावतीमधील संघाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली. कमलताईंची वेळ घेऊन भेट घेतली. यावेळी चार प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कमलताईंना शताब्दी वर्ष सोहळ्यासाठी आमंत्रित केले. त्यांनी होकार दिल्यावरच कार्यक्रम पत्रिकेवर नाव छापण्यात आल्याची माहिती दिली. प्रसारमाध्यमांवर फिरत असलेले कमलताईंचे पत्र खोटे असल्याचा दावाही त्यांनी केला.