नागपूर : अखिल भारतीय साहित्य अकादमी ही संस्था नियुक्त केलेली समिती नव्हे तर नोकरशहा चालवतात. त्यांना साहित्याशी काही देणे घेणे नसते, असे परखड मत ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी व्यक्त केले. साहित्य अकादमीच्या केंद्रीय सदस्यपदी डॉ. प्रमोद मुनघाटे यांची निवड करण्यात आली आहे. या निमित्ताने आयोजित त्यांच्या सत्कारप्रसंगी एलकुंचवार बोलत होते. राष्ट्रभाषा संकुलाच्या बाबुराव धनवटे सभागृहात गुरुवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी एलकुंचवार म्हणाले, प्रमोद मुनघाटे यांचे अभिनंदन करण्यापेक्षा साहित्य अकादमीचे अभिनंदन केले पाहिजे. साक्षेपी, पुरोगामी आणि डाव्या विचारावर ठाम असलेल्या प्रमोदची अकादमीवर सदस्य म्हणून झालेली निवड ही योग्य माणसाची निवड आहे. साहित्य अकादमी ही तिथला सचिव सांभाळतो. अध्यक्ष केवळ स्वाक्षरी करण्यापुरता असतो. नोकरशांच्या मतानुसार तिथला कारभार चालतो. त्यांना तुम्ही लेखक आहात की कवी याबाबत काही देणे घेणे नसते. मला जागतिक दर्जाचे नाटककार म्हणून संबोधले जाते. मला २००२ मध्ये पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी मला अकादमीच्या कार्यालयात मिळालेली वागणूक कोणालाही मिळू नये अशी होती.

अकादमीचा पुरस्कार समारंभ आहे असे कुठलेही वातावरण त्यावेळी अकादमीच्या कार्यालयात नव्हते. साहित्य अकादमीबद्दल नुसताच भ्रम जाणवला. ज्या दिवशी पुरस्कार समारंभ होता त्या दिवशी अकादमीची निवडणूक होती. अकादमीच्या कार्यालयात गेलो व चौकशी केंद्रावर विचारपूस केली, माझी ओळख दिली तर तेथे बसलेल्या दोन तीन मुलींनी मला कशासाठी आले अशी विचारणा केली. मला पुरस्कार मिळाल्याचे सांगितले तर त्यांनी आधीपासून दोन पुरस्कार प्राप्त साहित्यिक बसले असल्याचे सांगितले. सायंकाळी पुरस्कार समारंभ होता त्या ठिकाणी गेलो तर आम्हाला कोणी विचारले नाही. जिथे जागा होती तिथे बसलो आणि परत आलो. दरम्यान, पुस्तकांना पुरस्कार देताना पुस्तकाची नव्हे तर लेखकाच्या जातीची चर्चा होत, असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांनी केले. 

अशा संस्था स्वायत्त कशा?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साहित्य संस्था स्वायत्त असतात असे आपण ऐकले आहे. पण, अशी परिस्थिती आता राहिली नाही. सरकारकडून पैसा घेणाऱ्या संस्था स्वायत्त कशा राहू शकतात, असा प्रश्नही एलकुंचवार यांनी उपस्थित केला.