पोलीस ठाण्यांतील उपक्रम दुर्लक्षित पोलीस ठाण्यात तक्रारी घेऊन येणाऱ्यांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेले ‘स्वागत कक्ष’ धूळखात आहेत. नागरिकांच्या सोयींसाठी असलेल्या उपक्रमाकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्यानेच ही अवस्था निर्माण झाल्याची भावना सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे. प्रत्येक नागरिकाला कोणतीही समस्या भेडसावल्यास किंवा त्रास झाल्याने तो पोलीस ठाण्यात पोहोचतो. तेथे त्याला योग्य मार्गदर्शन मिळावे आणि त्याच्या तक्रारीचे निवारण व्हावे, एवढीच त्याची अपेक्षा असते. अनेकदा पोलीस सहकार्य करीत नाही, दिवसभर ताटकळत ठेवले जाते, अशा तक्रारी प्रशासनाकडे येतात. त्यावर उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने ‘स्वागत कक्ष’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. जवळपास तीन वर्षांपूर्वी राज्यभरातील इतरही पोलीस ठाण्यांसह नागपुरातील प्रत्येक ठाण्यात असे कक्ष निर्माण सुरू झाले. सुरुवातीला या कक्षात महिला व पुरुष असे दोन कर्मचारी ठेवण्यात आले. स्वागत कक्ष पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळच असल्याने पोलीस ठाण्यात दाखल होणारा व्यक्ती कक्षात चौकशी करायचा. त्या ठिकाणी त्यांची तक्रार ऐकल्यानंतर योग्य मार्गदर्शन करून तक्रारदाराला संबंधित अधिकाऱ्याकडे पाठविण्यात येत असे. या उपक्रमामुळे पोलिसांची प्रतिमाही सुधारण्यास मदत झाली होती. कालांतराने कामाचा ताण, वरिष्ठांच्या दुर्लक्षितपणामुळे ‘स्वागत कक्ष’ रिकामे झाले. त्या ठिकाणी केवळ पाटी शिल्लक राहिली आणि पोलीस ठाण्यांचे काम ‘ये-रे माझ्या मागल्या’ झाले. आज शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत २९ पोलीस ठाणी आहेत, तर जवळपास ३० लाख लोकसंख्या आहे. कायदा व सुव्यवस्था चांगली ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांची मदत करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले ‘स्वागत कक्ष’ पूर्ववत सुरू होतील, असा सवाल सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. ‘स्वागत कक्षाचे’ पुनरुज्जीवन लवकरच स्वागत कक्षाची संकल्पना अतिशय चांगली आहे. पोलिसांवर दैनंदिन कामाचा प्रचंड ताण आहे. त्यामुळे कदाचित स्वागत कक्षाच्या ठिकाणी कर्मचारी उपस्थित राहात नसावे. मात्र, या संकल्पनेचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. पोलीस ठाण्याच्या प्रथमदर्शनी भागात आता विशिष्ट स्वरूपाचे टेबल ठेवण्यात येत असून ते खरेदी करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. शिवाय स्वागत कक्षाच्या ठिकाणी बसण्याकरिता कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. शिवाय पोलीस निरीक्षकांनाही हे प्रशिक्षण देण्यात आले असून ते आपले कर्मचारी तसे तयार करतील. यातून प्रत्येक पोलीस ठाण्यात एकप्रकारची तक्रार आल्यास सर्व ठिकाणी सारखीच उत्तरे मिळतील आणि नागरिकांचे समाधान होईल. शिवाजी बोडखे, सहपोलीस आयुक्त.