बुलढाणा : संत गजानन महाराज संस्थान मंदिराचा परिसर, रथ, मेणा अश्व, टाळ मृदूंगाचा गजर, नाम घोष, सातशे वारकरी, ओसंडून वाहणारा उत्साह आणि भारावलेले पवित्र वातावरण अशा थाटात अन् दिमाखात शेगावच्या गजानन महाराज पालखीने आज सोमवार, २ जून रोजी सकाळी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले. विधिवत पूजन करण्यात आल्यावर पालखी सातशे वारकऱ्यांसह नागझरी येथील गोमाजी महाराज संस्थानकडे मार्गस्थ झाली.
पालखीचे हे ५६ वे वर्ष
पालखी सोबत भजनी दिंडी, गज व अश्वासह ५०० वारकरी सहभागी झाले आहे. संपूर्ण राज्यभरातून आषाढी एकादशीला श्री क्षेत्र पंढरपूरला विविध संतांच्या पालख्या दिंडीसह नेण्याची परंपरा वर्षानुवर्षांपासून आहे. शेगाव येथील श्री गजानन संस्थानची पालखी परंपरा १९६८ पासून अखंड सुरु आहे. यावर्षी पालखीचे ५६ वे वर्ष असून या दिंडीमुळे विवेक, वैराग्य, भक्ती व ज्ञान या तत्वांचा लोकांना बोध होतो.
आध्यात्मिक कार्य गतीमान होवून धर्माप्रती श्रध्दा व भावना वृध्दीगंत होतात. दारिद्रय, अज्ञान, अंधश्रध्दा, व्यसनाधिनता अशा अनेक समस्यांनी ग्रासलेली अनेक छोटी गावे पायी वारीच्या वाटेत आहेत. श्री क्षेत्र पंढरपूरपर्यंत ७२५ कि.मी. आणि श्री क्षेत्र पंढरपूर ते शेगावपर्यंत परतीचा प्रवास हा ५५० किलोमीटर आहे. पालखीचा एकुण प्रवास १२७५ किलोमीटरचा आहे. आज २ जून रोजी गजानन महाराज संस्थान मंदिर परिसरातून श्रींच्या पालखीला प्रारंभ झाला.शहरातील श्रींचे प्रगटस्थळ, देशमुख यांच्या मळ्यात वारकऱ्यांना फराळ, चहा देण्यात आला. तद्नंतर श्रींच्या पालखीने श्री क्षेत्र नागझरीकडे प्रस्थान केले संतनगरीतील हजारो आबालावृद्ध भाविकानी आपल्या पालखीला निरोप दिला.
विविध व्यवस्था
श्रींचे पालखी सोबत असलेल्या वारकरी मंडळींना ठिकठिकाणी चहापानी व अल्पोपहाराची व्यवस्था राहते. तसेच श्रींच्या पालखीचे गावातील नागरीकाकडून मनोभावे श्री महाराजांना शाल, श्रीफळ वाहून स्वागत केल्या जाते. श्रींचे पालखी सोबत प्रवास करताना वारक-यांची दुपारी व रात्री भोजन प्रसादाची व्यवस्था केली जाते. त्याचप्रमाणे वाटेने चहापानी व फराळाची व्यवस्था सुध्दा श्रींच्या भक्तांकडून केल्या जाते.
रात्रीचे मुक्कामी निवासाची व्यवस्था धर्मशाळा, मंगल कार्यालय व शाळा यामध्ये केलेली असते. दिंडीतील वारकरी मंडळींना आवश्यकतेनुसार औषध, इंजेक्शन, सलाईन देवून सेवार्थ औषधोपचार करण्यात येतो. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याकरीता टँकरची व्यवस्था केलेली असते. शेगाव संस्थानने पायी वारीकरीता श्री महाराजांची चांदीची नवीन पालखी बनारस येथील कारागिर आणून तयार करून घेतली आहे. त्यावरील नक्षीकाम अत्यंत कलापूर्ण असून ही पालखी पाहताक्षणीच अंत:करणातील भक्तीभाव उंचबळून येतो.
‘जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल , जय गजानन श्री गजानन, गण गण गणात बोते’, मंत्राचा नाम जप करीत वारकऱ्यांनी संतनगरीतून श्री विठ्ठलाच्या पंढरीकडे प्रस्थान केले.
बुलढाणा : संत गजानन महाराज संस्थान मंदिराचा परिसर, रथ, मेणा अश्व, टाळ मृदूंगाचा गजर, नाम घोष, सातशे वारकरी, ओसंडून वाहणारा उत्साह आणि भारावलेले पवित्र वातावरण अशा थाटात अन् दिमाखात शेगावच्या गजानन महाराज पालखीने आज सोमवार, २ जून रोजी सकाळी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले.… pic.twitter.com/HoO0jTiToX
— LoksattaLive (@LoksattaLive) June 2, 2025
अकोल्यात दोन दिवस मुक्कामी
तब्बल ३३ दिवसांचा पायी प्रवास आणि ७२५ किमी चे अंतर कापून श्रींची पालखी ४ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूरला पोहोचणार आहे.
श्रींची पालखी संतनगरी शेगावातून निघाल्यानंतर श्री क्षेत्र नागझरी येथील श्री संत गोमाजी महाराज संस्थान मध्ये पोहचणार आहे. महाप्रसाद घेऊन सायंकाळी अकोला जिल्ह्यातील पारस येथे श्रींच्या पालखीचा रात्रीचा मुक्काम राहील. ३ जुन रोजी पारस येथून निघून दुपारी गायगाव येथे तर रात्री भौरद येथे श्रींच्या पालखीचा मुक्काम राहील. ४ जून रोजी सकाळी भौरद येथून निघून अकोला येथे ४ व ५ जून असा दोन दिवस श्रींच्या पालखीचा मुक्काम राहील. त्यानंतर निर्धारित मार्गाने श्रींची पालखी ४ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखी पोहोचणार आहे.
३१ जुलैला स्वगृही श्री विठ्ठलाच्या पंढरीत श्रींच्या पालखीचा मुक्काम ४ जुलै ते ९ जुलै पर्यंत राहणार आहे. श्री गजानन महाराज संस्थानच्या पंढरपूर शाखेत श्रींच्या पालखीचा पाच दिवस मुक्काम राहणार आहे. श्रींच्या पालखीचा परतीचा प्रवास संत नगरी शेगाव कडे १० जुलै रोजी सुरू होईल. पंढरपूर ते शेगाव हा ५५० किमी चा प्रवास आहे. असा येण्या जाण्याचा १३०० किमीचा पायी प्रवास श्रींच्या पालखीतील वारकरी भक्ती भावाने आनंदात करणार आहेत. ३० जुलै रोजी खामगाव मुक्कामी राहिल्यानंतर ३१ जुलै गुरुवार रोजी श्रींची पालखी स्वगृही संतनगरी शेगावमध्ये दाखल होणार आहे.