भंडारा : विविध शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठीचा ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम आज भंडाऱ्यात होत आहे. त्यासाठी गावोगावच्या लोकांना आणण्यासाठी एसटी बस आरक्षित करण्यात आल्याने ग्रामीण व शहरी भागातील नेहमीच्या मार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसला आहे. भंडारा बस स्थानकावर सकाळपासूनच प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली असून आगारप्रमुखांनी प्रवाशांना याबाबत पूर्वसूचना देण्याची किंवा बसस्थानकांवर तसे फलक लावण्याची तसदी घेतली नाही. यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.

‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी आज सकाळपासूनच जिल्ह्यातील सर्व आगारांतून ग्रामीण भागासाठी बस सुटल्या नाहीत. जिल्हाभरातून लाभार्थ्यांना ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था शासनाच्या खर्चातून करण्यात येत आहे. रात्री सर्व बसेस दसरा मैदान येथे जमा करण्यात आल्या. सकाळी त्या लाभार्थ्यांना आणण्यासाठी सोडण्यात आल्या. मात्र हा कार्यक्रम पूर्वनियोजित असला तरी एसटी विभागाला त्याचे योग्य नियोजन करता आले नाही. बस फेऱ्या कमी होण्याबाबत प्रवाशांना मागील दोन ते तीन दिवसांपासून सूचना देणे गरजेचे होते. मात्र, तशी तसदी एसटी महामंडळाने न घेतल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

हेही वाचा – यवतमाळ : व्हिडीओ लाईक्स करताय? तर सावध व्हा! रिवार्डच्या आमिषाला बळी पडून तरुणाने ११ लाख गमावले अन्..

हेही वाचा – गडचिरोली : खाणविरोधी आंदोलन चिघळण्याची शक्यता! तोडगट्टा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात, झोपड्यांची नासधूस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाळेला सुट्टी

दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर आजपासून खासगी शाळा सुरू होणार होत्या. मात्र या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शाळांना अचानक सुट्टी जाहीर करण्यात आली. एरवी भर उन्हाळ्यात तापमानाचा पारा चढलेला असताना शाळांना सुट्टी दिली जात नाही, त्यामुळे आता कार्यक्रमासाठी शाळांना सुट्टी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.