नागपूर: विरोधी गटातील आमदारांना तू निवडून कसा येतो हेच बघतो, असा दम देणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकशाही नीट समजून घ्यावी, विधानसभा निवडणुकीत बारामतीमध्ये त्यांना हे कळेल, असा टोला विदर्भातील कॉंग्रेस नेते सुनील केदार यांनी लगावला.

केदार सध्या पुण्यात कॉंग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी गेले आहेत. तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना वरील वक्तव्य केले. लोकसभा निवडणुकीत विदर्भात कॉंग्रेसला घवघवीत यश मिळेल,असा विश्वास व्यक्त केला. अजित पवार हे विरोधी गटातील आमदारांना दम देत “तुम्ही विधानसभा निवडणुकीत निवडून कसे येतात हेच बघतो” असा इशारा देतात. याबद्दल केदार यांना विचारले असता ते म्हणाले, हा प्रकार योग्य नाही. ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी लोकशाही समजून घ्यायला हवी. आमदार लोकांमधून निवडून येतात. विधानसभा निवडणुका येऊ द्या, बारामतीमध्ये कळेल त्यांना.

हेही वाचा – नागपूर : लग्नाचे आमिष देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भवती होताच प्रियकर फरार

भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात कॉंग्रेस हरणार असा विश्वास व्यक्त केला होता. त्यावर केदार यांनी प्रतिक्रिया दिली. फडणवीस भाजप नेते आहेत. त्यांना तसे बोलावेच लागते असे केदार म्हणाले. अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेस सोडायला नको होती, असे केदार म्हणाले.

हेही वाचा – नागपूर : आमदार कृष्णा खोपडेंची आर्थिक फसवणूक, ठकबाजाने…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसला पन्नासहून अधिक जागा मिळणार नाही, असे प्रचार सभेत सांगितले आहे. याकडे केदार यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, पंतप्रधान काय म्हणाले यावर मी बोलणार नाही. पण देशातील लोकशाही वाचवण्यासाठी लोकांनी निर्णय घेतला आहे. केदार यांनी नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा निवडणुकीत सर्व शक्ती पणाला लावली आहे. पहिल्या टप्प्यात येथे मतदान झाल्याने केदार इतर मतदारसंघात प्रचारासाठी बाहेर पडले आहेत.