नागपूर : काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) या दोन्ही पक्षांची भूमिका सावरकर यांच्याबाबत भिन्न आहे. ‘सावरकर’ आमच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाहीत. लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मांडली.

पटोले म्हणाले, देशातील राजकीय परिस्थितीचा विचार करून एका मोठय़ा लढाईसाठी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस किमान समान कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आले. सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसची भूमिका आधीपासूनच स्पष्ट आहे, त्यात नवीन काहीच नाही. काँग्रेस पक्षाने विचारांशी कधीच तडजोड केली नाही. काँग्रेस सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार करणारा पक्ष असून कुठल्याची जाती, धर्माचा वा व्यक्तीचा द्वेष करत नाही. सावरकरांच्या मुद्दय़ांवर आमचे नेते राहुल गांधी व शिवसेना नेते उद्धव ठाकरे चर्चा करतील, असेही पटोलेंनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सावरकर यांचा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत

सावरकर माफी मागून परत आल्यानंतर त्यांनी देशात हिंदू – मुस्लीम वाद घडवून आणला. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला. देशाच्या फाळणीत त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी देशात विषाक्त वातावरण निर्माण केले. त्यातूनच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या झाली, असे देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनीच म्हटले आहे, याकडेही पटोलेंनी लक्ष वेधले.