नागपूर : विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसने एकजुटीचे दर्शन घडवले. पक्षाच्या निरीक्षकाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीला जिल्हा काँग्रेसमधील सर्व गटाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.निरीक्षक रणजित कांबळे यांनी जिल्हा काँग्रेसच्या गणेशपेठ येथील कार्यालयात ही बैठक घेतली. या बैठकीला जिल्हयाचे प्रभारी अध्यक्ष बाबा आष्टनकर, माजी मंत्री सुनील केदार, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार संजय मेश्राम, जिल्ह्याचे कार्यकारी अध्यक्ष अश्विन बैस, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष मुक्ता कोक्कडे, माजी उपाध्यक्ष कुंदा राऊत, माजी सभापती अवंतिका लेकुरवाळे, माजी आमदार एस.क्यू. जमा, हुकूमचंद आमधरे, तक्षशीला वाघधरे, प्रकाश वसू, राजा तिडके, तापेश्वर वैद्य प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार-पाच महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ झटकून नव्या दमाने कामाला लागण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. काँग्रेसचा जनाधार कायम आहे. काँग्रेस पक्षाला पराभूत करणे सोपे नाही. परंतु काँग्रेसमधील नाराज गट दूर जातो. अशाप्रकारे काँग्रेसच काँग्रेसला हरवत असते, असे मत यावेळी वक्त्यांनी व्यक्त केले. सर्व गटांनी एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे.
ईव्हीएममध्ये घोटाळा होऊ शकत नाही. संपूर्ण देशभर ईव्हीएम मॅनेज करणे अशक्य अशी बाब आहे. आता ही कारणे सोडा. कामाला लागा. त्याशिवाय आपला पक्ष मजबूत होणार नाही. एकमेकांची उणीदुणी काढत बसू नका. गटबाजी सोडा. जे झाले ते विसरून जा. आता नव्या निवडणुकांना आपल्याला सामोरे जायचे आहे. त्यापूर्वी आपला पक्ष कसा मजबूत करता येईल याकडे लक्ष द्या असा सल्लाही कांबळे यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिला.
पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्याने नागपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. त्यानंतर जिल्हाध्यक्षाचा प्रभार पक्षातील ज्येष्ठ नेते बाबा आष्टनकर यांना सोपवण्यात आला आहे. जिल्हा परिषद, पंचायती समितीच्या निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी पूर्णवेळ जिल्हाध्यक्ष नेमण्यात येणार आहे. त्यासाठी निरीक्षकांनी स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले.