गडचिरोली : नदीपात्रात अंघोळीला गेले. पाणी तसे कमी असल्यामुळे ‘व्हॉलीबॉल’ खेळण्याचा मोह आवरता आला नाही आणि तिथेच घात झाला. गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तीन भावी डॉक्टरच्या मृत्यूने सर्वत्र शोककळा पसरली आहे. ११ मे रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास सर्व मृतदेह शोधण्यात पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या चमुला यश आले. शनिवारी अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले होते.

१० मे हा गडचिरोलीच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी काळा दिवस ठरला. सुट्टी असल्याने येथील ‘एमबीबीएस’च्या प्रथम वर्षात शिकत असलेले ८ भावी डॉक्टर दुपारच्या सुमारास जवळ असलेल्या वैनगंगा नदीवर अंघोळीसाठी गेले होते. चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीत येत असलेल्या पात्रात तसे पाणी कमी असल्याने ‘व्हॉलीबॉल’ खेळण्यासाठी सर्व विद्यार्थी नदी पात्रात उतरले. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाच जण बुडू लागले. त्यातील दोघांनी कसाबसा आपला जीव वाचवला, पण तिघे बुडाले. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु पाण्याची खोली अधिक असल्याने प्रयत्न निष्फळ ठरले. यात

गोपाळ गणेश साखरे (२०,रा. चिखली ),पार्थ बाळासाहेब जाधव (२०, रा. शिर्डी) व स्वप्नील उद्धवसिंग शिरे (२०, रा. संभाजी नगर) या तिघा भावी डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी अंधार पडल्याने उशिरापर्यंत मृतदेह हाती लागले नव्हते. रविवारी सकाळीच प्रशासनाने शोधकार्य हाती घेत मृतदेह खोल पाण्यातून बाहेर काढले. परिसर चंद्रपूर हद्दीत येत असल्याने सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सावली शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर कुटुंबाला सोपविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे याच नादीपात्रात पूर्वीही दुर्दैवी घटना घडल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुटूंबियांसह सर्वांनाच धक्का

गडचिरोली येथे याच वर्षी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे. पहिल्याच वर्षी या दुर्दैवी घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. अथक परिश्रमातून या तिघांनी वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. तिघेही अभ्यासात हुशार होते. त्यामुळे कुटुंबीयांनाही खूप अपेक्षा होत्या. भविष्यात डॉक्टर बनून आई वडिलांचे नाव मोठे करायचे, असे स्वप्न घेऊन गडचिरोलीत प्रवेश घेतला होता. मात्र, नियतीच्या मनात वेगळेच होते. या घटनेमुळे तीनही मृतकांच्या कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला आहे.