नागपूर : वाघांसह बिबट्याचे होणारे हल्ले रोखण्यासाठी एआय आधारित नवीन अलर्ट सिस्टीम लावली जाणार असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. चंद्रपूर येथे पाच आणि सहा जूनला आयोजित “वनशक्ती” या महिला परिषदेसाठी जाताना ते नागपुरात विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलले.

आम्ही नुकतीच यासंदर्भात मंत्रालयात मानव-वन्यजीव संघर्षावर बैठक घेतली. या बैठकीत विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. यातील एक उपाययोजना म्हणजे एआय आधारित यंत्रणा. राज्यात वाघ, बिबट्यांचा वावर असलेल्या भागात प्रामुख्याने विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात एआय यंत्रणा लावण्याचे प्रस्तावित केले आहे. यामुळे लोकांचा जीव जाणार नाही. यासाठी कॅम्पा, वन्यजीव गरज पडल्यास मँग्रोव्हमधला निधी वापरला जाईल, असे वनमंत्री म्हणाले.

महाराष्ट्र सरकार यासंदर्भातील तंत्रज्ञान खरेदी करणार असून ते या भागांमध्ये लावण्यात येईल. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तो प्राणी आल्याचा फोटो, व्हिडिओ घेतल्या जाईल आणि सायरन वाजून अलर्ट दिला जाईल. संध्याकाळी साडेसात ते सकाळी साडेसातपर्यंतचा काळ महत्त्वाचा असतो. लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी सोलर फेंसिंग लावण्यात येईल. यासह अनेक उपाययोजना केल्या जाईल, असेही वनमंत्री नाईक म्हणाले. वन विभागासह प्रत्येक विभागात आम्ही मायक्रो लेव्हलवर बदल करतोय. त्यातून निश्चितपणे चांगले बदल होतील. जनतेची, माध्यमांची मदत लागणार आहे, असे नाईक म्हणाले.

वनाधिकारी काम करतात..

नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी येथे वाघाच्या हल्ल्यात माणसाचा मृत्यू झाला. त्या परिसरात वनाधिकारी, कर्मचारी काम करत होते. समाजात गैरसमज पसरवले जातात, पण विभागाचे अधिकारी त्यांचे प्रयत्न कोणाला सांगत नसतात. नालायक असणारे अशा पद्धतीचे बोलत असतात, आम्ही आमचे प्रयत्न करत असतो, असे वनमंत्री नाईक म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वनखात्यातील महिलांचा सत्कार

प्रधान मुख्य वनसंरक्षक व वनबलप्रमुख शोमिता विश्वास यांनी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलाचा सन्मान करण्याचा कार्यक्रम चंद्रपुरात आयोजित केला आहे. पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर “वनशक्ती” महिला परिषद होत आहे. या बहिणीच्या मागे भावाची शक्ती आहे. यासाठी चंद्रपूर दौऱ्यावर जात असल्याचे वनमंत्री गणेश नाईक म्हणाले.