अमरावती : ग्राहकांना अचूक व वेळेत वीजबिल देण्यास उपयुक्त ठरणारे अत्याधुनिक टीओडी वीजमीटर राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे अमरावती जिल्ह्यातही बसविण्यात येत आहेत. हे मीटर नवतंत्रज्ञानावर आधारित असून तांत्रिकदृष्ट्या ते अधिक स्मार्ट स्वरूपाचे असले तरी ते प्री-पेड नसून, पोस्टपेड आहेत. पूर्वीप्रमाणेच वीजवापरानंतरच ग्राहकांना वीजबिले मिळणार आहेत. हे मीटर मोफत बसवण्यात येत असून, ग्राहकांना कुठलाही आर्थिक भुर्दंड बसणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
महावितरणच्या टीओडी मीटरमध्ये मानवी हस्तक्षेपाला अजिबात वाव नाही. प्रगतशील तंत्रज्ञानाचा वापर वीजक्षेत्रात होणे ही काळाची गरज आहे. स्वयंचलित मीटर रीडिंगमुळे ग्राहकांना अचूक व वेळेवर देयके मिळतील. त्यामुळे वीजबिलाच्या संदर्भाने होणाऱ्या ग्राहक तक्रारीतही कपात होईल. सद्यस्थितीत कृषी वर्गवारी वगळता इतर सर्व वर्गवारीतील ग्राहकांना टीओडी मीटर बसविण्यात येत आहेत. अमरावती परिमंडळात जीनस या एजन्सीला हे काम दिले असून सुरुवातीच्या काळात सरकारी कार्यालये, सरकारी निवासस्थाने, मोबाईल टॉवर, नादुरुस्त मीटरच्या ठिकाणी हे टीओडी मीटर बसविण्यात आले आहेत.
नवीन वीजजोडणी देतानाही टीओडी मीटर बसविण्यात येत असून, सोलर नेट मीटरिंगसाठीही त्याचा वापर करण्यात आला आहे. आतापर्यंत अमरावती जिल्ह्यात ९० हजार ३९ टीओडी मीटर बसविण्यात आले आहेत.
महावितरणच्या नव्या वीजदर प्रस्तावात ग्राहकाने वीज कधी वापरली त्या वेळेनुसार दरात सवलत देण्यात येणार आहे. टीओडी मीटर असल्याशिवाय ही सवलत मिळू शकणार नाही. त्यामुळे ग्राहकांच्या दृष्टीने टीओडी मीटर आवश्यकच आहे. नव्याने बसविण्यात येणारे वीजमीटर अत्याधुनिक व स्मार्ट स्वरुपाचे असले तरी ते प्री-पेड नाहीत किंवा ते बसविण्यासाठी व मीटरची किंमत म्हणून ग्राहकांकडून कुठलेही शुल्क आकारले जात नाही. ग्राहकाने वापरलेल्या विजेची अचूक नोंद घेऊन योग्य वीजबिल देण्यास हे मीटर उपयुक्त ठरणार आहेत.
शिवाय मीटर नादुरूस्त किंवा सदोष मीटर असलेल्या ग्राहकांना त्यांच्या वापराचे अचूक वीज बिल देण्यासाठी या ग्राहकांना टिओडी मीटर प्राधान्याने लावण्यात येत असल्याचे महावितरण अमरावती परिमंडळ कार्यालयाने स्पष्ट केले आहे. टीओडी मीटरमुळे मीटरचा रिअल टाइम डेटा उपलब्ध होतो. मीटर नादुरुस्त झाल्याची माहिती त्वरित मिळते. मानवी हस्तक्षेपाला वाव नसल्याने अचूक व वेळेवर बिल मिळते. वीज वापरानुसार रीडिंग येते. अचूक वीज बिल येणार असल्याने विलंब शुल्क, दंड, व्याज वाढणार नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.