सुमित पाकलवार, लोकसत्ता

गडचिरोली : रामायणातील खलनायक पात्र रावण, ज्याचे दरवर्षी दसऱ्याला दहन केल्या जाते. अशा या रावणाच्या मुलाची चक्क एक नव्हे दोन मंदिरे गडचिरोलीत असून याठिकाणी दरवर्षी मोठी जत्रा भरत असते. इतकेच नव्हे तर नवसाला पावणारा ‘मेघनाथ’ म्हणून या भागातील लोकांची प्रचंड श्रद्धा आहे. मेघनाथाचे हे जगातील एकमेव मंदिर असल्याचा दावा येथील लोक करतात.

पुराणकथेत रामायणाबद्दल आजही लोकांच्या मनात प्रचंड आकर्षण आहे. यातील सर्वच पात्राची नावे त्यांच्या तोंडी आहे. यातील असेच एक मोठे पात्र म्हणजे, रावणाचा मुलगा ‘मेघनाथ’. ज्याने राम-रावण युध्दात ‘सर्पबाण’ चालवून लक्ष्मणाला घायाळ केले होते. त्याच लक्षमणाने नंतर मेघनाथचा वध केला. यावेळी त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले. त्यातील शिर गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब येथे तर धड आरमोरी तालुक्यातील वासाळा येथे कोसळले. तेव्हापासून याठिकाणी मेघनाथाचे मंदीर आहे. अशी या परिसरात अख्यायिका आहे.

आणखी वाचा-“संजय गांधी निराधार योजनेचा निधी तत्काळ वितरित करा,” वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांना भावनिक साद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशातील हे एकमेव मंदीर असल्याचा दावा अनेकजण करतात. इतकेच नव्हे तर मेघनाथ नवसाला पावतो अशी येथील लोकांची श्रद्धादेखील आहे. त्यामुळे दरवर्षी येथे जत्रेचे आयोजन केल्या जाते. भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होत नवस फेडतात. दत्त जयंती नंतरच्या पहिल्या गुरुवारी येथे जत्रा भरते. या जत्रेला दोनशेहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. असे गावातील जुनेजाणते सांगतात. वर्षभर मागितलेले नवस पूर्ण झाल्यानंतर मंदीरात भाविक लाकडी किंवा मातीचा घोडा ठेवतात. त्यापूर्वी नवस पूर्ण झालेले भाविक घोड्याची वाजतागाजत मिरवणूक काढतात. देशातील विविध भागात रावणाबद्दल आजही वेगवेगळा मतप्रवाह दिसून येतो. गडचिरोली जिल्ह्यातील काही आदिवासी बहुल क्षेत्रात रावणाची पूजा देखील केली जाते हे विशेष.