नागपूर : पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये (नागपूर विभाग) २०२० आणि २०२१ या दोन वर्षांत सतत विषमज्वराची (टायफॉईड) रुग्णसंख्या वर्षाला तीन हजाराहून खाली होती. परंतु, २०२२ मध्ये ही रुग्णसंख्या दुप्पटीहून जास्त म्हणजे तब्बल ६ हजार ८५८ एवढी आढळली आहे. नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या वर्षभरात विषमज्वराचे २ हजार ७७१ रुग्ण नोंदवले गेले होते. परंतु, एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. ही रुग्णसंख्या २०२१ मध्ये २ हजार ८३६ तर २०२२ मध्ये तब्बल ६ हजार ८५८ रुग्ण एवढी नोंदवली गेली. परंतु, या आजाराचा एकही मृत्यू नसल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाल्याचे माहितीच्या अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले आहे.