मेहकर, जि. बुलढाणा : भाजपचे हिंदुत्व बेगडी असून यांनी गोमांस निर्यात करणाऱ्याकडूनही निवडणूक रोखे घेतल्याचा सनसनाटी आरोप शिवसेना ( उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मेहकर येथे आज केला. मेहकर येथे पार पडलेल्या जनसंवाद सभेत त्यांनी बंडखोर खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमूलकर यांच्यावर खरपूस टीका केली.

हेही वाचा >>> महायुतीच्या उमेदवारीचे कोडे अधिकच गडद! -खा. भावना गवळी मुंबईत तर पालकमंत्री संजय राठोड यवतमाळात परतले

सभेला संजय राऊत, अंबादास दानवे, नितीन देशमुख या नेत्यांसह जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हा प्रमुख आशिष रहाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिवसैनिक व नागरिकांनी मोठ्या संख्येने सभेला हजेरी लावली. ठाकरे म्हणाले, की भाजपचे हिंदुत्व, राष्ट्रप्रेम बेगडी आहे. मुळात यांचे स्वातंत्र्यलढ्यात योगदानच काय? असा रोखठोक सवाल त्यांनी केला. आमचे हिंदुत्व मनात राम आणि हाताला काम असे आहे. घरातील चूल पेटविणारे आहे. याउलट भाजपचे हिंदुत्व घर पेटविणारे, द्वेष पसरविणारे आहे. आम्ही आमदार, खासदार दिले तर भाजपने गद्दार दिले, अशी खोचक टीका त्यांनी केली. यांनी पुरोगामी महाराष्ट्राचे राजकारण खालच्या स्तराला नेऊन ठेवले. त्यांना याची लाज वाटायला हवी. उपमुख्यमंत्री देवेंद्र मोठया अभिमानाने सांगतात, मी पुन्हा आलो, ते दोन पक्ष फोडून आलो आहे. आता यांना काय म्हणावे? असा प्रश्न त्यांनी केला. राममंदिर झाले पण आम्हाला भीती होती की, आत मूर्ती कोणाची राहील. ती मोदींची तर राहणार नाही ना ? असा टोला ठाकरे यांनी लगावला.

हेही वाचा >>> देवेंद्र फडणवीस – रवी राणांची विमानतळावर भेट, नवनीत राणांच्‍या उमेदवारीवर….

खासदार जाधव व आमदार रायमूलकर यांचे गृहक्षेत्र असलेल्या मेहकरात उद्धव ठाकरे यांनी जाधव यांच्यावर टीकास्त्र सोडले. याला तीन वेळा आमदार, तीन वेळा खासदार केले. याला सर्व काही दिल्यावरही याने गद्दारी केली. यामुळे या दोघांसह बुलढाण्याच्या गद्दाराला  निवडणूकीत पराभूत करून जमिनीत गाडा असे आव्हान त्यांनी केले.

खतांच्या पोत्यावर मोदी!

नरेंद्र मोदींच्या स्वकेंद्रित पद्धतीबद्धल बोलताना ते म्हणाले की, आता खतांच्या पोत्यावर सुद्धा त्यांचे फ़ोटो आहेत. हा तर पंतप्रधान पदाचा अवमान असल्याचे सांगून वर मोदींचा फोटो अन आत शेणखत असा हा विचित्र प्रकार आहे. या खतांनी राज्यात गद्दारीचे पीक वाढवायचा तर हा प्रकार नाही ना? असा सवाल ठाकरे यांनी केला.