नागपूर : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या चकमकीला पाच पोलीस जबाबदार असल्याची बाब चौकशीत समोर आली. या घटनेला पोलिसांप्रमाणे तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणीस देखील तेवढेच जबाबदार आहेत, असा आरोप माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. यासंदर्भात ‘एक्स’ (ट्वीट ) त्यांनी प्रतिक्रिया दिली.

या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रत्युत्तर देताना झालेल्या चकमकीत पोलीस वाहनात मृत्यू झाल्याचे पोलिसांनी म्हटले होते. या घटनेच्यावेळी जे पोलीस कर्मचारी वाहनात होते. ते या चकमकीला जबाबदार असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्याचा अहवाल न्यायालयासमोर आल्यानंतर विरोधी पक्षांनी या प्रकरणात सरकारवर टीका केली आहे. या घटनेसाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांना केला. ते म्हणाले, ” बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात भाजपशी संबंधित संस्थाचालकांवर कुठलिही कारवाई झाली नाही. आरोपी अक्षय शिंदेला बनावट चकमकीत ठार करण्यात आले. अशाप्रकारे भाजपशी संबंधित संस्था चालकाला वाचवण्यात आले. “

हेही वाचा…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महायुतीत परिस्थिती बिकट, शिंदेंना संपवून नवीन ‘ उदय ‘ पुढे येण्याची शक्यता, विजय वडेट्टीवार

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन युती सरकारने या प्रकरणात तयार केलेल्या‘फेक नरेटिव्ह’चे चौकशी अहवालाने पितळ उघड पाडले. या चकमकीची जबाबदारी जितकी पोलिसांची आहे तितकीच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. कारण जेव्हा ही चकमक झाली तेव्हा ‘एकनाथचा एक न्याय‘ आणि ‘देवाभाऊचा न्याय‘ म्हणून स्वतःला ‘हिरो’ बनवून घेण्यासाठी या चकमकीचे श्रेय घेण्याची स्पर्धा लागली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी युती सरकारने फक्त मतांसाठी मांडलेल्या बाजाराचे सत्य हळूहळू समोर येत आहे, असेही वडेट्टीवार यांनी त्यांच्या एक्सवरील प्रतिक्रियेत नमुद केले आहे.

हेही वाचा…सोने- चांदीच्या दरात मोठे बदल… नववर्षात हे आहेत दर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बदलापूर येथील एका खासगी शाळेत गेल्या ऑगस्ट महिन्यात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. त्या प्रकरणीतीलक्षय शिंदेचा पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू झाला होता.अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर विरोधी पक्षांनी सरकारवर तीव्र टीका केली होती. तसेच कोणाला वाचवण्यासाठी ही चकमक घडवण्यात आली, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. आरोपी शाळेचा कर्मचारी होता. त्याला बंदूक चालवता येत नव्हती. तसेच ज्याप्रकारे त्याचा मृत्यू झाला. त्याला बंदूकीच्या गोळा लागल्या. त्यावरून विरोधी पक्षांकडून संशय निर्माण केला जात होता. पोलीस व्हॅनमधून पळून जाणे शक्य नसताना, हात बांधलेले असतानाही अक्षय शिंदेनी पोलिसांची बंदूक हिसाकली. या कथनाकावर अनेकांनी प्रश्न निर्माण केले होते. आता महानगर दंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालात पाच पोलिसांना चकमक प्रकरणी जबाबदार धरण्यात आले आहे.