नाशिक : सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आमझर येथील पशुपालक चिंतामण वाघमारे यांच्या १३ बकरींचा बिबट्याने के लेल्या हल्ल्यात मृत्यू झाला.

आमझर गावात आदिवासी पारंपरिक पद्धतीने रानभाजी खाण्याचा सण होता. त्यामुळे पशुपालकाने चरण्याकरीता घेतलेल्या १५ ते २० बकऱ्या जंगलात सोडून तो गावात निघून आला. अंधार पडला तरी शेतातील झापावर बकऱ्या परतल्याच नाहीत. १३ बकऱ्या जंगलातील भोवर हेदीचा दरा येथेच राहिल्या. याच दऱ्यात खडकाची कपार असल्याने बिबट्यांचा अधिवास असतो. रात्रीच्या सुमारास बकऱ्यांच्या कळपावर अचानक हल्ला करुन बिबट्याने त्यांचा फडशा पाडला.

दोन बकऱ्यांचा तपास लागलेला नाही. शेतकऱ्याचे हजारो रुपयाचे नुकसान झाले आहे. हा भाग गुजरात राज्याचा सिमावर्तीलगतचा राखीव जंगलाचा आहे.  त्यामुळे अशा घटना पावसाळ्यात नेहमीच घडत असतात. काही दिवसापुर्वी याच शेतकऱ्याच्या गोऱ्ह्याचा बिबट्याने फडशा पाडला होता. वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी देवेंद्र ढुमसे यांनी घटनास्थळी भेट देऊन

पाहणी केली असून पंचनामा करण्यात आला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ललिता नाळे यांनी शवविच्छेदन केले असून अहवाल वनविभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.