मनमाड – येथून जवळच असलेल्या पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम कंपनीत इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालकाला अपमानकारक वागणूक दिल्याच्या निषेधार्थ टँकर चालकांनी प्रवेशद्वाराजवळच ठिय्या दिल्याने प्रकल्पाचे कामकाज प्रभावित झाले. तब्बल तीन तास प्रकल्पातून टॅंकरद्वारे होणारी टँकर वाहतूक ठप्प झाली होती.
पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केल्यानंतर प्रकल्पातून टँकरद्वारे इंधन वाहतूक सुरळीत झाली. मध्य प्रदेश येथून इथेनॉलने भरलेले टँकर पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम प्रकल्पामध्ये आलेले आहेत. चार दिवसांपासून इथेनॉलने भरलेले हे टँकर खाली करण्यासाठी कंपनीत घेतल्यानंतर बीपीसीएल कर्मचाऱ्यांनी टँकर चालक संगम पांडे (उत्तर प्रदेश) याच्याशी इंधन घेता येत नाही, कमी आहे, अशी कारणे पुढे करून हुज्जत घातली. टँकर खाली केला जाणार नसल्याची भूमिका घेतल्याने संबंधित टँकर चालक आणि कर्मचारी यांच्यामध्ये वाद उफाळला. झटापटीत टँकर चालकाच्या हातावर जखम झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या टॅँकर चालकाने थेट कंपनीच्या बाहेर प्रवेशद्वारावर येऊन ठिय्या दिला. तसेच बाहेरील टँकर आतमध्ये जाण्यास रोखले. त्यामुळे कंपनी प्रशासनाची तारांबळ उडाली. प्रशासनाने तत्काळ मनमाड पोलिसांना ही माहिती दिली.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टँकर चालकांशी चर्चा करून मध्यस्थी करून वाद मिटवला. त्यानंतर इंधन वाहतूक सुरळीत झाली. परंतु, दोन तास या प्रकल्पातून इंधन वाहतूक ठप्प होती. इथेनॉल खाली करण्यासाठी आलो असताना कर्मचाऱ्यांनी अर्वाच्च भाषेत बोलून अपमानित केल्याचा आरोप टँकर चालक पांडे यांनी केला आहे.