नाशिक – धुळ्यात विधिमंडळाची अंदाज समिती संशयाच्या भोवऱ्यात सापडली. आपल्याबरोबर जो चांगला त्याच्याशी सरकार चांगले, अशी सध्याची पद्धत आहे. भाजप आणि भ्रष्टाचार हे समीकरण जोडले जात आहे. लोकांना अनेक योजनांचे पैसे मिळत नाहीत. अधिकारी लाच मागतात. मंत्रालयात पेशवाई आल्यासारखे वातावरण आहे. विधिमंडळ अंदाज समितीकडून अहवाल मागवण्यापेक्षा या समितीचाच अहवाल मागविण्याची वेळ आली आहे, असे टिकास्त्र प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी सोडले.
प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यांच्यावतीने गुरुवारी येथे संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळा कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात सभागृहात या कार्यक्रमाआधी मॅरेथॉन चौक ते सभागृह अशी त्यांची जिरेटोप घालून घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. धुळ्यातील घटनेवरून कडू यांनी भाजप आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशाच्या विरोधात बोलण्यासारखे असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
धुळ्यातील घटनाक्रमाशी समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे नाव जोडले जात आहे. शासकीय विश्रामगृहातील खोली खोतकर यांच्या खासगी स्वीय सहायकाच्या नावे आरक्षित होती. या समित्या प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी असतात. परंतु, सध्या या समित्या भ्रष्टाचारात गुंतल्या असून ही स्थिती अत्यंत वाईट असल्याचे कडू यांनी नमूद केले. मंत्र्यांची मालमत्ता पाहिली तर राज्याचा वेगळा अर्थसंकल्प होईल. जो अधिकारी भ्रष्टाचारी आहे, त्याला चांगले खाते दिले जाते, असा टोला त्यांनी हाणला वळवाच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.
आधी शून्य पैशांवर विमा निघत होता. आता पैसे द्यावे लागतात. फळ उत्पादकांसाठी सरकारने चांगली योजना आणून काम करण्याची गरज त्यांनी मांडली. शेतकरी आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होऊन काही प्रश्न मार्गी लागले. मात्र, अपंगांचे प्रश्न बाकी आहेत. आठ जूनपासून आपण तुकडोजी महाराजांच्या समाधी स्थळाशेजारी आमरण उपोषणाला बसणार असल्याचे कडू यांनी जाहीर केले. वैष्णवी हगवणे संशयास्पद मृत्यू प्रकरणात राष्ट्रवादीच्या (अजित पवार)पदाधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.