चारुशीला कुलकर्णी

वेगवेगळ्या मागण्यांविषयी सत्ताधाऱ्यांकडून होणारी चालढकल आणि त्यातच नैसर्गिक संकटांची भर यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी नाशिकमधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत ‘शेतकरी वाचवा अभियाना’च्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत. खचलेल्या, नैराश्याने ग्रासलेल्या बळीराजाला सावरण्यासाठी, त्यांचे प्रश्न सुटावे याकरिता अभियान प्रयत्नशील असून आजवर हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी या अभियानात समस्या मांडत शंकांवर उत्तर मिळविले आहे.

Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना
repair work of creek bridge on uran panvel road completed
उरणच्या खाडीपूल दुरुस्तीचे काम पूर्ण; ‘हाइट गेट’ हटवण्याची प्रतीक्षा; चार गावांतील हजारो नागरिकांना दिलासा

शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी जाणीव असल्याने शेतकऱ्यांच्या मुलांनी ‘शेतकरी वाचवा अभियान’ सुरू केले आहे. खचलेल्या, अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मानसिक आधार मिळावा, त्यांच्याशी आपलेपणाने संवाद व्हावा, कर्जबाजारी, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यावर उपाययोजना करण्यासह शेतकऱ्याला आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास या माध्यमातून देण्यात येत आहे. हे काम नऊ वर्षांपासून अविरत सुरू आहे.

उपक्रमाच्या सुरुवातीला प्रकाश चव्हाण, राम खुर्दळ, राजू देसले, नाना बच्छाव यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी एकत्र येत गावागावांत शेतकरी संवाद सभा घेतल्या. ‘जागा हो बळीराजा, जागा हो’ या एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. हे काम करताना शेतकऱ्यांचे प्रश्न हे शासकीय विभाग, कर्ज प्रकरणांशी अधिक संबंधित असल्याचे लक्षात आले. त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संबंधित विभागांशी संपर्क करत काम सुरू केले.

गावपातळीवर दमलेल्या, खचलेल्या, कर्जबाजारी शेतकऱ्यांमध्ये आत्मबळ यावे यासाठी २०१६ मध्ये मदतवाहिनी सुरू करण्यात आली. याशिवाय शेतकरी समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी तसेच गावपातळीवर शेतकऱ्यांना या उपक्रमाची माहिती व्हावी यासाठी भित्तीपत्रक, चिकटपट्टीवर मजूकर छापण्यात आला. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि अडलेली कामे करून देण्यात कसोशीने प्रयत्न केले. न्यायालयाशी संबंधित अनेक प्रकरणे तडजोडीने मिटवली, सावकारांशी संबंधित प्रकरणांसाठी विधिज्ञ दत्ता निकम यांनी मदत केली.

अडचणींमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलू नये यासाठी अभियानतर्फे काम सुरू करण्यात आले. नाशिक जिल्ह्यात अभियानाच्या माध्यमातून शेतकरी आणि सरकार यात संवाद वाढावा, शेतकऱ्यांनी एकमेकांना मदतीसाठी हात द्यावा, शेतकऱ्यांमधील वाढते नैराश्य दूर व्हावे, गावातील लोककला आणि लोकमाध्यमांचे जतन संवर्धन व्हावे, कलांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपले दु;ख विसरून संकटाला सामोरे जाण्याचे बळ मिळावे यासाठी काम करण्यात येत आहे.

शेतकरी बांधवांसाठी गिरणारे येथे माहिती केंद्र सुरू करण्यात आले असून जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त चार गरीब कुटूंबांना शासकीय मदतीसाठी पाठपुरावा करण्यात आला. शेतकऱ्यांचे न्यायालयीन, स्थानिक वाद मिटावे म्हणून कायदेशीर शिबिरांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. त्यात अनेक वाद स्थानिक पातळीवरच मिटवले. वाढती व्यसनाधीनता, नैराश्य दूर व्हावे म्हणून नाटिका, एकपात्री प्रयोग, गाणी याद्वारे प्रबोधन करण्यात आले. गावपातळीवर पाणीटंचाई जाणवत असताना ‘पाणी अडवा पाणी जिरवा’, प्राचीन जलस्रोत संवर्धनासाठी सध्या जागृती करण्यात येत आहे.

हेही वाचा : चांगभलं : दगडखाण ते हातमाग; महिलांच्या आत्मनिर्भरतेचा संघर्ष

शेतकरी मदतवाहिनीवर आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी, समस्या अगदी आपलेपणाने ऐकून त्यांच्या मदतीला धावून जाण्याचे काम करोनाकाळात करण्यात आले. दीड वर्षात ४७हून अधिक शेतकऱ्यांना अशा प्रकारे साहाय्य करण्यात आले. आत्महत्येच्या विचाराने घर सोडलेल्या व्यक्तींना जगण्याचा विचार देऊन त्या शेतकऱ्याला त्याच्या घरी पोहोचविण्यात आले. याबाबत प्रशासकीय पातळीवर मात्र उदासीनता जाणवत असल्याची खंत राम खुर्दळ यांनी व्यक्त केली.

करोना काळात मदतीचा हात

करोनाकाळात व्यवहार ठप्प असताना अभियानाच्या वतीने आदिवासी शेतकऱ्यांना किराणा, ७०० विधवांना मदत, मच्छरदाणी, सॅनिटायझर आदी सामानांचे वाटप करण्यात आले. लोककलावंतांसाठी मदतीचा हात पुढे केला. सद्य:स्थितीत पेठ तालुक्यातील ५० गावांना टंचाई जाणवत आहे. पाण्याअभावी मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी गावांचा पाणीप्रश्न सुटण्याची गरज आहे. त्यासाठी अभियान काम करत आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांची वाहने जमा करून त्यांचे लिलाव केले जात आहेत. संकटात असलेले शेतकरी यामुळे अधिकच संकटातच सापडतील म्हणून या कारवाईस विरोध दर्शविण्यासाठी अभियानतर्फे आंदोलनही करण्यात येत आहे.