नाशिक – संघटनेच्या वादात वॉटर ग्रेसच्या सफाई कर्मचाऱ्यांना ठेकेदाराकडून शनिवारी मारहाण करण्यात आली. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात ठेकेदार कैलास मुदलियार याच्यासह पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल होण्यास विलंब होत असल्याने पोलीस ठाण्याच्या आवारात कर्मचाऱ्यांनी एकत्र येत घोषणाबाजी केली. काही काळ परिसरात तणाव होता.

हेही वाचा >>> “त्या ज्येष्ठ नेत्याने पोलीस ठाण्यासमोर झोपणे अयोग्यच”, पालकमंत्री गुलाबराव पाटील स्पष्टच म्हणाले..

शहरात वॉटर ग्रेस कंपनीच्या वतीने स्वच्छतेचा ठेका घेण्यात आला आहे. हा ठेका कैलास मुदलियार, विशाल खैरनार, हेमंत भंडारी आदींनी घेतला आहे. १४०० हून अधिक सफाई कर्मचारी कंत्राटी तत्वावर काम करत आहेत. ठेकेदारांकडून सफाई कर्मचाऱ्यांचे आर्थिक तसेच मानसिक शोषण करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. याविषयी महेंद्र दिव्य यांनी भूमिका मांडली. सफाई कर्मचारी म्हणून स्वच्छतागृहाची स्वच्छता, मृत प्राणी उचलणे यासह अन्य कामे केली जातात. मात्र ठेकेदार मुदलियार आणि त्यांच्या लोकांकडून सातत्याने शिवीगाळ करत खच्चीकरण केले जाते. शनिवारी आमच्यातील काही कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. काहींना कोंडले तर काहींना मारहाण केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे टाळल्याचा आरोप दिव्य यांनी केला.

हेही वाचा >>> नाशिक : दप्तर विसर्जन आंदोलन स्थगित; दरेवाडीची शाळा सुरु ठेवण्याबाबत मोठा निर्णय..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मारहाण झालेले चारूदत्त भालेराव यांनी आमच्याकडून कोऱ्या धनादेशावर स्वाक्षरी घेण्यात आल्याचा आरोप केला. २२ हजार रुपयांचा पगार असतांना केवळ हातात ११ हजार रुपये देण्यात येत आहेत. काही बोललो तर लॉगीन आयडी बंद करण्याची धमकी दिली जाते. यातून बाहेर पडण्यासाठी वेगळी संघटना करण्याचा प्रयत्न केला असता आपणास आणि सहकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. शिवीगाळ करत जात विचारण्यात आली. संबंधितांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी भालेराव यांनी केली. सफाई कर्मचाऱ्यांनी ठेकेदारांवर गुन्हा दाखळ करावा तसेच कंपनीचा ठेका रद्द करण्याची मागणी करत आंदोलन केले. यामुळे ऐन दिवाळीत शहर स्वच्छता आणि कंपनी ठेकेदाराच्या अनागोंदी कारभाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या आंदोलकांनी मनसे नेते दिलीप दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवस काम बंद आंदोलन करत महापालिका आयुक्तांना भेटण्याचा निर्णय घेतला आहे.