नाशिक : अनेक तालुक्यांमध्ये यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे जिल्हा दुष्काळाच्या गर्तेत सापडला आहे. ऑगस्टच्या अखेरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ६७२ मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो. यंदा आतापर्यंत केवळ ३८० मिलीमीटर म्हणजे ५६ टक्के पाऊस झाला आहे. अनेक भागात पिके करपली असून पुढील काळात पाऊस झाला तरी त्यांना जीवदान मिळण्याची शक्यता मावळली आहे. सिन्नर तालुक्यातील ४१ गावात तर पेरणीच झालेली नाही. जिल्ह्यातील धरणांमध्ये ७७ टक्के जलसाठा असून शासकीय धोरणानुसार केवळ पिण्यासाठी तो प्राधान्याने राखीव असणार आहे. या स्थितीत बदल न झाल्यास सिंचनासाठी पाणी मिळणे धूसर होणार आहे.

हेही वाचा : धनादेश न वटल्याने मुंबईच्या व्यापाऱ्यांना कैद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठक पार पडली. यावेळी प्रशासनाकडून दिल्या गेलेल्या माहितीतून दुष्काळाची स्थिती समोर आली. पावसाअभावी अनेक भागात गंभीर स्थिती आहे. या स्थितीत पिण्याचे पाणी, गुरांसाठी चारा आणि लोकांच्या हाताला काम, यादृष्टीने बैठकीत आढावा घेतला गेला. गेल्या वर्षी या काळात सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत अधिक म्हणजे ८७१ मिलीमीटर पाऊस झाला होता. यंदा हे प्रमाण निम्म्याहून अधिकने कमी आहे. पावसाअभावी अनेक भागात पिके करपली. किमान परतीचा पाऊस झाल्यास पिण्याच्या पाण्यासह रब्बी हंगाम शेतकऱ्यांना मिळू शकेल, असे भुसे यांनी नमूद केले. जंगलातील गवत, शेतातील चारा यातून चार महिने पशूधनाला खाद्य उपलब्ध होईल. चारा, गवत जिल्ह्याबाहेर जाणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली आहे.