लोकसत्ता प्रतिनिधी 

जळगाव: शहरातील महापौरांचा प्रभाग असलेल्या तांबापुरा परिसरातील पंचशीलनगर येथील ४० ते ५० रहिवाशांना २० ते ३५ हजारांपर्यंत घरपट्टीची देयके देण्यात आल्याने ते आक्रमक झाले आहेत. रहिवाशांनी महापालिकेवर धडक देत घरपट्टी भरणारच नाही, अशी ठाम भूमिका घेतली. 

महापालिकेचे कर नियमित भरूनही जळगावकर विविध मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचितच आहेत. खड्डेमय रस्ते, फुटलेल्या गटारी, सर्वत्र अस्वच्छता यामुळे जळगावकर त्रस्त आहेत. तांबापुरा परिसरातील पंचशीलनगरातील ४० ते ५० रहिवाशांना चक्क २० ते ३५ हजारांपर्यंत घरपट्टीची देयके देण्यात आली आहेत. त्यामुळे त्रस्त रहिवाशांनी समाजसेवक विखार खान, अरशद शेख, नियाजोद्दीन शेख यांच्या नेतृत्वात महापालिकेवर धडक देत प्रवेशद्वाराजवळच ठिय्या मांडला.

आणखी वाचा-प्रलंबित मागण्यांवर निर्णय घ्या, ईपीएस पेन्शनर्स उत्तर महाराष्ट्रस्तरीय मेळाव्यात मागणी 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रहिवासी महिलांनी महापौर जयश्री महाजन, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याशी पावसामुळे रस्त्यांची झालेली अवस्था, पाणीप्रश्न, गटारांची दुरवस्था, सांडपाण्याची समस्या आदींबाबत चर्चा केली. विखार खान यांनी अवाजवी रकमेची घरपट्टीची देयके आल्याने आम्ही भरणार नाही, अशी भूमिका मांडली. महापालिकेने घरपट्टी माफ करावी, अशी मागणी केली. आयुक्तांनी कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. महापौर व आयुक्तांना शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले.