जळगाव : जळगावमध्ये भाजपचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार करण पवार आणि उन्मेष पाटील हे येण्यापूर्वीच भाजपकडून जळगाव मतदारसंघातील उमेदवार बदलाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत, असे आमच्या कानी आले आहे. भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीचा चांगलाच धसका घेतला आहे, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केला आहे.

भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून दाखल झालेले भाजपचे खासदार उन्मेष पाटील व त्यांचे मित्र पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांचे जळगाव रेल्वेस्थानकात सायंकाळी सहाच्या सुमारास आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले. रेल्वे फलाटापासून महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार (पाटील), उन्मेष पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख सावंत यांना डोक्यावर घेत थेट शिवसेना भवनापर्यंत ढोल-ताशांच्या निनादात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, धरणगावचे माजी नगराध्यक्ष तथा युवासेना जिल्हाप्रमुख नीलेश चौधरी, महानगरप्रमुख श्याम तायडे आदींसह महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व काँग्रेसच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह चाळीसगाव, भडगाव, पारोळा, जळगाव, अमळनेर यांसह विविध तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : Lok Sabha Election 2024 : धुळ्यात काँग्रेसमध्ये अजून उमेदवाराचा शोध सुरू

जिल्हा संपर्कप्रमुख सावंत, पाटील आणि उमेदवार करण पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवादात भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. सावंत म्हणाले की, जिल्ह्यात येण्यापूर्वीच भाजपकडून उमेदवार बदलाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यासंदर्भात रेल्वे प्रवासात आम्हाला कळले. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीचा चांगलाच धसका घेतला आहे. ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद आहे आणि ही ताकद आता उन्मेष पाटील आणि करण पवार यांच्या माध्यमातून आणखी वाढणार आहे, असा विश्वास व्यक्त केला. ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांनीही भाजपकडून उमेदवार बदलाच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे आम्हाला आमच्या काही पदाधिकार्‍यांकडून सांगण्यात आल्याचे नमूद केले.

उन्मेष पाटील यांनी, ज्या पद्धतीने खान्देशात राजकारणाचे संस्कार रुजविले जात आहेत, ते खान्देशच्या संस्कृतीत तेढ निर्माण करणारे असल्याची टीका केली. आजपासून जिल्ह्यात कोणतेही भय, दहशत आणि मागच्या काळात जे द्वेषाचे राजकारण झाले, बदल्यांचे राजकारण झाले, ते आम्ही सर्व शिवसैनिक आता खपवून घेणार नाही, असा सूचक इशाराही उन्मेष पाटील यांनी दिला.

हेही वाचा : नाशिकमध्ये समाजमाध्यमातील वादग्रस्त संदेशामुळे जमावाकडून दगडफेक

भाजपच्या जळगाव मतदारसंघातील उमेदवार स्मिता वाघ यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. जिल्ह्यातील तालुका, गावागावांतील घराघरांत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते भेटीगाठी घेत आहेत. मतदारसंघातील जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विरोधकांकडून टीकाटिपणी करण्याचे काम सुरू आहे. पक्षाच्या उमेदवार बदलाबाबतच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. त्या केवळ अफवाच आहेत.

सुरेश भोळे (भाजप आमदार, जळगाव)