नाशिक : शहरात वाहनतळासाठी जास्तीत जास्त जागा उपलब्ध करणे, रस्त्यांचे रुंदीकरण आणि चालकांनी स्वयंशिस्त पाळल्यास गंभीर स्वरुप धारण करणाऱ्या वाहतूक कोंडीवर मात करता येईल, अशी भावना शहरवासीयांनी व्यक्त केली आहे. शहरातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर मात करण्यासाठी शिवसेना महानगरच्यावतीने ऑनलाईन सर्वेक्षणाद्वारे नागरिकांची मते जाणून घेण्यात आली. नागरिकांची भावना लक्षात घेऊन महानगरपालिकेने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेनेने मनपा आयुक्तांकडे केली आहे.

वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वेक्षणात सर्वाधिक म्हणजे ३२ टक्के नागरिकांनी वाहनतळासाठी अधिकाधिक जागा उपलब्ध करण्याची निकड मांडली आहे. मध्यवर्ती दाटीवाटीच्या बाजारपेठेसह अनेक भागात वाहने उभी करण्यासाठी वाहनतळ नाहीत. त्यामुळे वाहनधारकांकडून रस्त्यावर वाहने उभी केली जातात. वाहतूक कोंडीत भर पडण्याचे ते महत्वाचे कारण आहे. पुरेशी वाहनतळे उपलब्ध झाल्यास रस्ते वाहतुकीसाठी मोकळे होतील, याकडे या सर्वेक्षणातून लक्ष वेधले गेले आहे.

हेही वाचा : नाशिक जिल्ह्यात सरासरीच्या ३३ टक्के कमी पाऊस; पावसाळा संपत असतानाही टँकरच्या फेऱ्या कायम

रस्ते रुंद करण्याची गरज २६ टक्के नागरिकांनी मांडली. उपनगरांमधील रस्ते दुतर्फा आणि दुभाजक असणारे आहेत. या मार्गांवर विशिष्ट काही चौकात कोंडीला तोंड द्यावे लागते. काही रस्त्यांवर दुभाजकाची व्यवस्था नसल्याने वेगळेच प्रश्न निर्माण होतात. वाहनधारकांनी नियमांचे पालन केल्यास कोंडीचे निवारण होऊ शकते, असे मानणारे १८ टक्के नागरिक आहेत. ११ टक्के नागरिकांना वाहतूक पोलिसांची संख्या आणि कार्यक्षमता वाढविण्याची आवश्यकता वाटते.

हेही वाचा : नाशिकमध्ये भ्रमणध्वनी स्फोट, तीन जण जखमी

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी असे १० टक्के तर दिल्लीच्या धर्तीवर विशिष्ट क्रमांकानुसार वाहनांना एक दिवसाआड परवानगी द्यावी, असे सुचविणारे तीन टक्के नागरिक आहेत. सर्वेक्षणाची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांना दिली. यावेळी शिवसेना आयटी कक्षाचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, युवासेना जिल्हा चिटणीस आदित्य बोरस्ते उपस्थित होते.

हेही वाचा : नाशिक: मंडळांना मागील वर्षाचेच क्रमांक; विसर्जन मिरवणूक रेंगाळल्यास कारवाई; पोलिसांचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी शासकीय पातळीवरील उपाय योजनांसह व्यापक जनसहभाग महत्वाचा आहे. त्या अनुषंगाने ऑनलाईन पध्दतीने हे सर्वेक्षण करण्यात आले. महानगरपालिकेने जनभावनेची दखल घेऊन वाहतूक कोंडी कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी दिर्घकालीन उपाय योजना तातडीने राबविण्याची आवश्यकता आहे’, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी म्हटले आहे.