धुळे – शहरात आयोजित राज्यस्तरीय गुंतवणूक परिषदेमध्ये ८४३६ कोटींचे गुंतवणूक करार झाले असून ११५०६ जणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूकदारांना आकर्षिंत करुन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्याच्या उद्योग संचालनालयाच्यावतीने हॉटेल टॉपलाईन रिसॉर्ट येथे औद्योगिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ही माहिती देण्यात आली. उद्योग सहसंचालक वृषाली सोने यांनी राज्याच्या उद्योग धोरणानुसार २०२३ पर्यंत गुंतवणूक उद्दिष्टे गुंतवणूक परिषदांच्या माध्यमातून साध्य करण्याचा मानस असल्याचे सांगितले. जिल्ह्यात अनेक उद्योगांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असून, शासनाच्या विविध योजनांचा लाभ या क्षेत्रातील उद्योजकांना कसा घेता येईल, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी मैत्रीचे समन्वयक अधिकारी उमेश पाटील, स्वप्नील केंद्रे, यांनी मैत्री पोर्टलसंबधी मार्गदर्शन केले. सहायक आयुक्त (तांत्रिक) गणेश वंडकर यांनी वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ संदर्भात माहिती दिली. उपप्रकल्प संचालक नितीन पाटील यांनी महाराष्ट्र कृषी व्यवसाय नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाच्या योजनेवर, निर्यातदार राजेंद्र जाखडी यांनी जिल्ह्यातील निर्यातीच्या संधी, व्यवसाय विकास प्रमुखांनी लघु-मध्यम उद्योगांविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी शांती स्पिन्टेक्स लिमिटेड एक हजार कोटी, एच.डी. वायर प्रा.लि. दोन हजार कोटी, बेदमुथा इंडस्ट्रिज लिमिटेड ४६० कोटी, सनस्टॉर लिमिटेड ३२० कोटी, आशीर्वाद इलेक्ट्रॉनिक्स २० कोटी, पियुष लाईफस्पेस प्रा. लि. ११० कोटी यासह ११९ विविध कंपन्यांचे ८४३६ कोटी ४१ लाख रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. यातून ११५०६ जणांसाठी रोजगार निर्मिती होणार आहे.
या परिषदेला मध्य प्रदेश, गुजरात राज्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातील उद्योजक, गुंतवणूकदार, निर्यातदार, व्यापारी, तसेच इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.