नाशिक : कृषिमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळल्यापासून वादग्रस्त विधानांनी सातत्याने चर्चेत राहिलेले माणिक कोकाटेंनी आता वेगळाच पवित्रा घेतला आहे. उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र येण्यासंबंधीचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता त्यांनी या विषयावर कुठलेही भाष्य करणार नसल्याचे स्पष्ट केले. कारण, आपण खरे बोललेले तुम्हाला चालत नाही. तुम्ही आपण खरे बोललेले दाखवत नाहीत. आणि आपण खोटे बोलत नाही, असे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. प्रश्न दिल्यास त्याची लेखी उत्तरे देण्याची तयारीही त्यांनी दर्शविली.

शनिवारी येथे राष्ट्रवादीच्या (अजित पवार) बैठकीनंतर कोकाटे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शेजारील राज्यातून बनावट बियाण्यांची तस्करी होत असून अलीकडेच कृषी विभागाच्या कारवाईत तसा साठाही पकडला आहे. खरीप हंगाम सुरू होत असल्याने असे प्रकार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना सतर्कता बाळगून कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. पावसाने उघडीप घेईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. पावसाने दोन-चार दिवस उघडीप घेतल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. कारण पाऊस कायम राहिल्यास पेरणी वाया जाण्याची शक्यता असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

राज्यात खतांचा कुठेही काळाबाजार होणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज आहे. असे प्रकार कुठे निदर्शनास आल्यास कृषी केंद्रासह त्या भागातील कृषी अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जाईल. कृषी विभागाचा एक भाग जिल्हा परिषदेमार्फत काम करतो. त्यांच्याकडे कामाचा भार कमी आहे. त्यामुळे विभागाच्या काही योजना त्यांच्याकडे देता येतील का, याची छाननी प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सूचित केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्यातील मेळाव्यात नाशिकमधून १० हजार लोक सहभागी होणार

विधानसभेत राष्ट्रवादी अजित पवार गटाला नाशिकमध्ये मोठे यश मिळाले. त्यामुळे पक्षाने तीन मंत्रिपदे म्हणजे सत्तेतील ३५ टक्के वाटा नाशिकला दिला. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पुणे येथे होणाऱ्या राज्यव्यापी मेळाव्यात नाशिकमधून १० हजार लोकांना सहभागी करण्याची तयारी करण्यात आल्याचे कोकाटे यांनी नमूद केले.