नाशिक : दहावीचा निकाल लागल्यानंतर शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेची तयारी सुरु करण्यात आली आहे. यंदा पहिल्यांदाच ग्रामीण तसेच शहरी असा फरक न ठेवता राज्य पातळीवर एकाच वेळी ही प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार आपल्या आवडत्या महाविद्यालयाची नोंद पहिल्या १० महाविद्यालयांसाठी करता येणार आहे. हा निर्णय राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना लागु राहील. नाशिक शहर तसेच जिल्हा परिसरात १०० हून अधिक महाविद्यालयांनी नोंदणी न केल्याने प्रवेश प्रक्रियेवर याचा काय परिणाम होतो, शिक्षण विभागाची याविषयी असणारी भूमिका याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शासनाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर लवकरच अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरूवात होईल, अशी माहिती शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण यांनी दिली.

मंगळवारी राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी परीक्षेचा निकाल जाहिर झाला. आता अकरावी प्रवेशासाठी केंद्रिभूत पध्दतीने शहरासह ग्रामीण भागातही ऑनलाईन प्रवेश दिले जाणार आहेत. अकरावी प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्यस्तरावरून काही वर्षांपासून ऑनलाईन पध्दतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. परंतु, यामध्ये ग्रामीण भाग वगळण्यात येत असे. यंदा राज्यस्तरावरून एकाचवेळी शहर आणि ग्रामीण असा भेद न ठेवता ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हा तसेच शहरातून महाविद्यालयाची नोंदणी करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना राज्यातील कुठल्याही महाविद्यालयात आपल्या गुणवत्तेनुसार प्रवेश घेता येणार आहे. आयसीएसई, सीबीएसई, आश्रमशाळा, आयबी अन्य शिक्षण मंडळाना हा नियम लागु नाही. शाखानिहाय प्रवेश क्षमता, अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहायित तुकड्या, इनहाऊस कोटा, व्यवस्थापकीय कोटा आदींची माहिती संकलन करण्याचे काम महाविद्यालयीन स्तरावर सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिक जिल्ह्यात अनुदानित १४६, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित महाविद्यालये ८९ आणि इतर अशा ३४७ महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामध्ये कला शाखा ३४,२००, वाणिज्य १८२००, संयुक्त २०००, विज्ञान ३४७६० अशा एकूण ८९१६० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल. पुढील पंधरा दिवसात ही प्रक्रिया सुरू होणार असून सध्या विद्यार्थ्यांची नोंद सुरू आहे. अकरावी प्रवेश प्रक्रिया अर्जाचा पहिला भाग भरण्यास सुरूवात होईल. नंतर खऱ्या अर्थाने अकरावी प्रवेश प्रक्रिया वेग घेईल.