नाशिक : लाडकी बहीण योजनेसाठी निधी देणे राज्य सरकारला अवघड होत असल्याचे सर्वज्ञात आहे. आता अर्थकारण कसे करावे हे नेत्यांना कळत नसावे. त्यामुळे इतर विभागातीन निधी वळवला जात आहे. अन्य योजनांचा निधी बंद केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी केला. इतर विभागांचा निधी न वळवता राज्याचे उत्पन्न वाढविण्याकडे लक्ष द्यावे, असा सल्ला त्यांनी दिला.
शनिवारी आमदार पवार यांच्या उपस्थितीत स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाचे प्रमुख शरद पवार हे वर्धापनदिनी भूमिका मांडतील, असे त्यांनी नमूद केले. ठाकरे आणि पवार नाममुद्रेवर (ब्रँड) त्यांनी मिश्किल टिप्पणी केली. नाममुद्रेत दोन प्रकार आहेत. जुनी नाममु्द्रा जी लोकांनी निवडलेली असते. लोकांनी पाठिंबा दिल्याने मोठी नाममुद्रा तयार झालेली असते. काही नवीन नाममुद्रा असतात. त्यांना पैसे, बाहेरचे लोक आणून आणून मोठे केलेले असते, असा टोला त्यांनी भाजप सत्ताधाऱ्यांचा नामोल्लेख न करता हाणला. पवार आणि ठाकरे परिवाराची खरी ताकद लोक असून त्यामुळे ते टिकतील, असा दावा त्यांनी केला. पवार नावाच्या दोन नाममुद्रा असून राष्ट्रवादी एकत्र येणार का, या प्रश्नावर त्यांनी याबद्दल सातत्याने चर्चा होत असली तरी निर्णय होत नसल्याचे नमूद केले.
विधिमंडळ अंदाज समितीच्या दौऱ्यावेळी धुळ्यात शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रकमेबाबत विशेष तपास पथक स्थापून काहीच होणार नसल्याचा दावा त्यांनी केला. आजवर अनेक असे पथक झाले, त्यातून काही हाती लागले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. इतकी रक्कम तिथे कुठून आली, हा प्रश्न आहे. या प्रकरणाची न्यायिक चौकशी झाली पाहिजे. पैसे कुठून आले आणि जबाबदार कोण, हे उघड होणे आवश्यक आहे, असे पवार यांनी सांगितले.
महिला आयोग अध्यक्षपदी अराजकीय व्यक्तीची गरज
महिला आयोग स्वायत्त संस्था असून राजकीय पक्षांची शाखा म्हणून तिने काम करणे योग्य नाही. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाला बसवायचे, याबाबत राज्य सरकारने या अधिवेशनात ठरविलेच पाहिजे. अराजकीय व्यक्ती असेल तर महिलांना न्याय मिळेल. आगामी अधिवेशनात हा मुद्दा मांडला जाणार असल्याचे सुतोवाच आ. रोहित पवार यांनी केले.