जळगाव – जिल्ह्यात भाजपसह राष्ट्रवादीने (अजित पवार) महाविकास आघाडीचे मोठे मोहरे गळाला लावून घाऊक पक्ष प्रवेश एका पाठोपाठ घडवून आणले. यामुळे महायुती मजबूत होताना दिसत असली, तरी त्यातील शिवसेनेची (एकनाथ शिंदे) मात्र कोंडी होत आहे. कारण, दोन्ही पक्षांनी प्रवेश दिलेले मातब्बर हे शिंदे गटाला यापूर्वी अनेक वेळा अडचणीचे ठरले आहेत. यापुढेही परिस्थिती तशीच राहण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात भाजपसह शिंदे गटाचे प्रत्येकी पाच तर, अजित पवार गटाचा एकमेव आमदार आहे. याशिवाय, लोकसभेचे दोन्ही खासदार भाजपचे आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपच्या रक्षा खडसे आणि राज्याच्या मंत्रिमंडळात गिरीश महाजन आणि संजय सावकारे हे दोन मंत्री आहेत. गुलाबराव पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा खाते व जिल्ह्याचे पालकमंत्रीपद एवढीच काय ती शिंदे गटाची जमेची बाजू आहे. असे असताना, काही दिवसांच्या वेगवान घडामोडी लक्षात घेता भाजप आणि अजित पवार गटाकडून जिल्ह्यात शिंदे गटाची सातत्याने कोंडी केली जात असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचे वेध लागल्यापासून विशेषत्वाने भाजप आणि अजित पवार गटाच्या कुरघोड्या वाढल्या आहेत.
दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीत पक्षप्रवेश करणाऱ्यांचा ओघ वाढल्यावर विरोधी पक्षातील कोणालाही प्रवेश देण्याआधी त्याची राजकीय पार्श्वभूमी तपासून मित्र पक्षांना विश्वासात घेण्याचे सूत्र महायुतीत ठरले होते. प्रत्यक्षात, भाजपने सर्वात आधी एरंडोल-पारोळ्यात शिंदे गटाचे आमदार अमोल पाटील यांच्या विरोधात लढणारे अपक्ष उमेदवार भगवान महाजन यांना पक्ष प्रवेश देऊन महायुतीचे सूत्र धुडकावून लावले. तेवढ्यावरच न थांबता भाजपने आता पुन्हा पाचोऱ्यात आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी करणारे माजी आमदार दिलीप वाघ यांना पक्षात घेऊन शिंदे गटाला जिव्हारी लागणारा निर्णय घेतला आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादीने (अजित पवार) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या तीव्र विरोधानंतरही यापूर्वीच शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ.सतीश पाटील, माजी आमदार कैलास पाटील आणि दिलीप सोनवणे आदींना प्रवेश देऊन शिंदे गटाच्या जखमेवर मीठ चोळले आहे. भाजपसह अजित पवार गटाच्या पक्षप्रवेश रचनेत झालेल्या कोंडीमुळे जळगावसह धरणगाव, चोपडा, एरंडोल, पारोळा, पाचोरा आणि भडगाव या काही तालुक्यात जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये एकतर्फी विजय मिळविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिंदे गटाला परिणामी मोठा हादरा बसला आहे.