मोहितेश बावीस्कर याचे खंडणीसाठी अपहरण व हत्या प्रकरणी अटकेत असणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी तसेच पोलिसांसह अन्य प्रशासकीय यंत्रणांचा परस्परांशी योग्य समन्वय रहावा जेणेकरून मृतदेहाची विटंबना होणार नाही या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने पोलीस आयुक्तालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.
मूळचा मालेगावचा असणारा पण शिक्षणासाठी नाशिक येथे आलेला मोहितेश केटीएचएम महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेत होता. १४ ऑक्टोबर रोजी त्याचे अपहरण झाले. या बाबत १५ ऑक्टोबर रोजी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्याच काळात त्र्यंबकेश्वर येथील सापगाव शिवारात मोहितेशचा खून झाल्याचे लक्षात आले. तपासाची चक्रे फिरताच अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. पैशाच्या मोहापायी त्याचा मित्र आकाश प्रभू आणि सौरभ चौधरी यांनी त्याचे अपहरण करून खून केला. त्यानंतर मोहितेशच्या वडिलांना २० लाखांच्या खंडणीसाठी दूरध्वनी केला होता. आकाश व सौरभ या संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण घटनाक्रम उलगडला. या प्रकारामागे आणखी कोणी सूत्रधार आहे काय याची चौकशी करून सर्व आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली.
मोहितेशची हत्या १४ ऑक्टोबरला झाली. त्याचा मृतदेह १७ ऑक्टोबरला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्र्यंबकेश्वर आणि सरकारवाडा पोलीस ठाणे तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्यात समन्वय नसल्याने मृतदेह दोन दिवस रुग्णालयात पडून होता.
या कालावधीत त्याच्या मृतदेहाची विटंबना झाली याचा निषेध करण्यात आला. असा प्रकार पुन्हा घडू नये, मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांना वाट पहावी लागू नये यासाठी आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली. या मोर्चात मोहितेशचे नातेवाईक व महाविद्यालयीन मित्रही विविध फलक घेऊन सहभागी झाले.